चिंतलपेठमधील महिलेवर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करा

अम्ब्रिशराव आत्राम यांची मागणी

अहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल या महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला, ही दुःखद घटना असून यानंतर अशा दुःखद घटना टाळण्यासाठी वन विभागाने त्या नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली.

चिंतलपेठ येथे सोमवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर सध्या शेतीची कामे सुरू असून या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शेतीची कामे खोळंबणार असून याचा फटका थेट सर्वसाधारण शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे वनविभागाने या गंभीर घटनेची दखल घेऊन त्वरित त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे.

दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आणला असता अम्ब्रिशराव यांनी मंडल कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना करत धीर दिला. उपस्थित वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेची माहिती घेऊन प्रस्ताव तयार करून वारसांना लवकर अर्थसहाय्य द्यावे अशी सूचना केली.

यावेळी त्यांनी थेट उपवनसंरक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.वन विभागातर्फे सध्या तात्पुरत्या स्वरूपात मंडल कुटुंबियांना ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली. ही रक्कम अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते देण्यात आली.