गडचिरोली : माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ साजरा करताना गडचिरोली जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. जि.प.चे अनेक विभाग प्रमुख (क्लास-वन अधिकारी) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा या गावात प्रत्यक्ष शेतात जाऊन चिखलात भात रोवणी केली. याशिवाय शिंगाडा लागवडीचा अभ्यास केला.
अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांप्रमाणे शेतातील चिखलात उतरून रोवणी करताना पाहून उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटले. पिकाच्या लागवडीपासून तर पीक कापणीपर्यंत शेतकऱ्यांना किती मेहनत घ्यावी लागते याची एक झलक यानिमित्ताने अधिकाऱ्यांना अनुभवता आली.
शेताच्या बांधावर जाण्याआधी जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.किशोर झाडे, कृषी विकास अधिकारी आनंद पाल, जिल्हा मृदा चाचणी अधिकारी प्रदीप तुमसरे, तंत्र अधिकारी आनंद कांबळे तसेच कृषी विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी अधिकारी आनंद पाल यांनी प्रास्ताविकात वसंतराव नाईक यांचे जीवनकार्य आणि कृषी दिनाचे महत्त्व सांगितले. यानंतर जिल्ह्यातील पीक स्पर्धा व कृषी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले. कृषी विषयक सखोल मार्गदर्शन सत्रात डॉ.लाकडे यांनी फळबाग व भाजीपाला लागवडीबाबत माहिती दिली, तर डॉ.झाडे यांनी भात व तुर लागवडीवर भर दिला. तुमसरे यांनी मृदा आरोग्य पत्रिकेचे महत्त्व पटवून दिले. आनंद कांबळे यांनी “कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स” आणि “महाविस्तार” ॲपविषयी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन अनुप भोयर व सुनील बुद्धे यांनी, तर आभार चलकलवार यांनी मानले.
मुख्य कार्यक्रमानंतर अधिकाऱ्यांचे पथक पाथरगोटा गावातील शेतकरी रामदास दोनाडकर यांच्या शिंगाडा लागवडीस भेट देण्यासाठी रवाना झाले. त्या ठिकाणी शिंगाडा लागवडीचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर शेतकरी दोनाडकर यांच्या शेतात भात रोपवाटिकेची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांनी स्वतः भात रोवणी केली. यानंतर शेतकऱ्यांसोबत शिंगाडा व भात लागवडीबाबत चर्चासत्र झाले.
या क्षेत्रभेटीत विनोद उद्धरवार (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा), नितीन पाटील (उपअभियंता, यांत्रिकी), शेखर शेलार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन), नारायण सरदार (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग), चेतन हिवंज (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा), रवींद्र कणसे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत), विलास कावळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), मंगेश आरेवार (गटविकास अधिकारी, आरमोरी), निलेश गेडाम (तालुका कृषी अधिकारी, आरमोरी), अशोक कुर्जेकर (सहाय्यक गटविकास अधिकारी आरमोरी), संदीप नाकाडे (मंडळ कृषी अधिकारी आरमोरी), कृष्णदास दोनाडकर (कृषी अधिकारी, पं.स.आरमोरी), योगेश रणदिवे (कृषी अधिकारी आरमोरी) तसेच आरमोरी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, तथा शेतकरी उपस्थित होते.