मागास जिल्हा ही गडचिरोलीची ओळख आम्ही पुसून टाकणार- मुख्यमंत्री शिंदे

महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली : गडचिरोलीत खाण उद्योगातून रोजगाराच्या संधी मिळण्यास वाव आहे. त्याला सरकारकडून चालना दिली जात आहे. त्यामुळे मागास जिल्हा ही गडचिरोलीची ओळख पुसून टाकण्यात यश येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महिलांच्या उत्थानासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या राज्यस्तरीय उपक्रमाची सुरूवात मंगळवारी गडचिरोलीत झालेल्या भव्य कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल, लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव आदी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.

महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा आजचा दिवस आहे. या अभियानात शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून बचत गटाच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे. यापुढच्या काळात देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

आज सुरजागडच्या माध्यमातून 10 हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उद्योगाचे विस्तारीकरण लवकरच होणार आहे. आणखी 10 ते 15 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गडचिरोली होऊ शकते देशाची स्टिल सिटी– उपमुख्यमंत्री फडणवीस

भविष्यात गडचिराली ही देशाची स्टिल सिटी होऊ शकते. येथे येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याची राज्य शासनाने अट ठेवली आहे. जल, जमीन, जंगल हा आदिवासींचा अधिकार असून पर्यावरणाचे रक्षण करूनच गडचिरोलीचा विकास केला जाईल. राज्यातील पुढारलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीचे नाव होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

एकूण लोकसंख्येमध्ये 50 टक्के वाटा असलेल्या महिलांचे जोपर्यंत सशक्तीकरण होत नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही, ही संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. एक महिला सशक्त झाली तर ती संपूर्ण कुटुंबाला सशक्त करते. त्यामुळे महिलांच्या सशक्तीकरणाचे हे अभियान सुरू केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य शासनही महिलांच्या विकासासाठी कटिबध्द असून प्रत्येक बचत गट सक्षम होण्यासाठी सन 2023 मध्ये राज्य शासनाने विक्रमी 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना उपलब्ध करून असल्याचे, फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, खनिज उद्योगातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विकासकामांमधून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे सांगितले. खासदार अशोक नेते यांनीसुध्दा केंद्रासह राज्य सरकारचे गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष असल्याने विकासकामे झपाट्याने सुरू असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली.

विविध क्षेत्रातीत नवरत्न महिलांचा सत्कार

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नवरत्न महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात सुलोचना मडावी (पेसाअंतर्गत ग्रामसभेसाठी विशेष पुढाकार), मनिषा मडावी (फॅशन डिझायनिंग व व्यक्तिमत्व विकास), संगिता युरोजवार (कोरोनामध्ये 100 टक्के लसीकरण), सविता भोयर (रंगभूमीवरील योगदान), रुपाली मोहुर्ले (दारुबंदीसाठी लढा), किरण कुर्मावार (शिक्षण क्षेत्र), जमुना देहारी (बचत गटाची चळवळ,) पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार (दुर्गम भागात स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रभार) आणि टेबु उसेंडी (शिवणकाम प्रशिक्षक) यांचा समावेश होता. याशिवाय कविता मेहक्षेत्री आणि ज्योती कुंडारकर यांना व्हील चेअरचे वाटप करण्यात आले.

149 कोटी 75 लाखांच्या 30 विकासकामांचे भूमिपूजन

यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 मोबाईल टॉवर, प्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती), मानव विकास मिशन अंतर्गत 8 एकल गोडावून, एकल सेंटर, आदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद व नगर पंचायत प्रशासकीय इमारत, तालुका क्रिडांगण, वघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. आरमोरी), चोप-तमाशीटोला ते वडसा मोठया पुलाचे बांधकाम करणे. (ता. वडसा) सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. धानोरा), सानगडी- गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-ची सुधारणा करणे (ता. कुरखेडा), मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे. (ता. वडसा), मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ता. आरमोरी), मार्कण्डा देवस्थान नुतनीकरण, चपराळा देवस्थान अशा एकूण 149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

लाभार्थ्यांना धनादेश वाटप

अझिमा अब्दुल अझीझ पंजवानी, क्रीतिका खोबागडे, मनिषा भोयर, रत्नमाला बावणे, गीता वाघाडे, पल्लवी कोसरे, वर्षा चौधरी, किर्ती भुरसे, पायल झंझाळ, माधुरी देवगिरकर, कल्पना म्हशाखेत्री, कनक नैताम, सृष्टी खोब्रागडे, वैशाली खोब्रागडे, जानव्ही मेहेरे, रागिणी मेहेरे, डॉली महानंदे यांच्यासह बेरोजगार अंध समितीच्या संध्या दादगाये, शुभांगी गेडाम, वर्षा दुर्गे व इतर लाभार्थ्यांना विविध योजनांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, ट्रेलर, ड्रोजर, हार्वेस्टर तर शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. भविष्यात गडचिरोलीतील 10 हजार शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पारंपरिक आदिवासी टोप घालून तसेच रेला नृत्याने स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या थिम साँगचे लोकार्पण करण्यात आले.