नक्षलवादाविरूद्धच्या शेवटच्या लढाईसाठी सज्ज राहा – डीजीपी रश्मी शुक्ला

आदिवासींच्या मदतीनेच नक्षलवाद संपविणार

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे. जनतेने माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. येत्या काळात येथील आदिवासी बांधवांच्या मदतीनेच आम्ही नक्षलवाद संपवू, असा विश्वास व्यक्त करत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 पथकाचा मला अभिमान आहे. सी-60 पथकातील जवानांनी आता नक्षलवादाविरुद्धच्या शेवटच्या लढाईवर लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले. डीजीपी म्हणून पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्या शनिवारी गडचिरोलीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी अतिसंवेदनशिल भागातील पोलिस मदत केंद्रांना भेटी देऊन सी-60 पथकाच्या जवानांना मार्गदर्शन केले.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या गर्देवाडा पोलिस मदत केंद्राच्या परिसरात महाजनजागरण मेळाव्यात रश्मी शुक्ला यांनी मार्गदर्शन केले. वांगेतुरी पोलिस मदत केंद्राच्या कामकाजाची पाहणी करून उपस्थित अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधला. तसेच सुरजागड येथील पोलिस अंमलदार निवासस्थान आणि भोजन कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. प्राणहिता (अहेरी) येथील उपमुख्यालयात सी-60 जवानांचे मनोबल उंचावत त्यांनी जवानांशी संवाद साधला. याशिवाय किटाळी येथील कमांडो ट्रेनिंग सेंटरलाही त्यांनी भेट दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी बॅरेक, टॅक्टीकल फायरिंग रेंज, कंट्रोल रुम व फायरबट क्र.1 च्या नुतनीकरणाचे उद्घाटन शुक्ला यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश हे प्रामुख्याने उपस्थित होते.

नागरिक, विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

महाजनजागरण मेळाव्यात उपस्थित नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड व इतर शासकिय कागदपत्रे, स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, मच्छरदानी, ब्लॅकेट, लोवर-टी शर्ट, मोठे बल्ब, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी गर्देवाडा येथे जनजागरण मेळाव्याला उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना पोलिस महासंचालक शुक्ला म्हणाल्या, शिक्षणाच्या जोरावर आदिवासी समाजातील महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी येऊ शकतात. आजपर्यंत माओवाद्यांच्या प्रभावामुळे हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला होता. परंतू आता नवीन पोलिस मदत केंद्रांच्या स्थापनेमुळे येथील नागरिक भयमुक्त होऊन विकासाच्या प्रवाहात येतील. पोलिस दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

किटाळी येथे पोलिस महासंचालकांनी बिडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक), माओवादविरोधी अभियानामध्ये गडचिरोली पोलिस दलाकडून वापरलेली शस्त्रास्त्रे, ड्रोन व विविध प्रकारच्या युद्धनितीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती घेतली.