गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे धडे

गोंडवानाचा पुढाकार, प्रशिक्षकांची निवड

गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य माहिती व्हावी, या धोरणाबाबत त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उकल व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील (बारावीच्या) विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

या प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ येथे पार पडले. प्रशिक्षणाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, बारावीनंतर काय? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. पुढे पदवीच्या प्रथम वर्षात येऊन विद्यार्थी संभ्रमात असतात की आता काय करायचे?, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुढचे शिक्षण होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे, याबाबत त्यांच्या मनात स्पष्टता नाही. हीच स्पष्टता आणून देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यार्थ्याना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती दिली जाणार आहे. यासाठी विद्यापीठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील काही शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यांनी इतर विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, यासाठी हे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थी पुढचे शिक्षण कसे घेतील आणि तेही आपल्याच जिल्ह्यात, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून सांगितले तर या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. रोजगाराचे स्वरूप बदलत आहे, हे विद्यार्थ्यांना सांगावे लागेल. एका विशिष्ट जॉबच्या मागे न लागता, आऊट ऑफ बॉक्स शोधावे लागेल. २०४७ मध्ये भारत जगात पाहिल्या क्रमांकाचा देश व्हावा, यासाठी सुद्धा या विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे कुलगुरू डॉ.बोकारे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.

प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, यावेळी अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे यांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात माहिती दिली. प्रा.डॉ. प्रिया गेडाम यांनी विद्यार्थी विकासच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.धनराज पाटील यांनी ‘नॅक’ संदर्भात माहिती दिली.

प्रास्ताविक विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे समन्वयक डॉ.विवेक जोशी यांनी, संचालन प्रा.विकास चित्ते यांनी तर आभार प्रा.केशव बैरागी यांनी मानले.