आलापल्लीत आनंद आश्रमाचे लोकार्पण, वृद्धाश्रमातून मिळणार मायेची ऊब

भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केला विश्वास

आलापल्ली : म्हातारपणात थकलेल्या शरीरात काम करण्याचे त्राण राहात नसताना अनेकांना घराबाहेर निघावे लागते. अशावेळी स्वतः कमावून जगणे कठीण होते. अशा कठीण परिस्थितीत ज्यांना वृद्धाश्रमात जागा मिळते अशा वृद्धांना आता आनंद आश्रमातून मायेची ऊब मिळेल, असा विश्वास माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथे विश्वभारती सेवा संस्थेद्वारा संचालित, तसेच जमीनदानकर्ते स्व.डॉ.ईश्वर लक्ष्मणराव भंडारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साकारलेल्या आनंद आश्रमाचा (वृद्धाश्रम, अनाथाश्रम, महिला गृहउद्योग, गौशाळा) लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय वनाधिकारी प्रदीप बुधनवार, प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ ९-बटालियनचे कमांडंट राजेश्वर बाळापूरकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, समाजसेविका देवी ईश्वर भंडारी, नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, मुख्याध्यापक गजानन लोनबले, विश्वभारती सेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाग्यश्रीताई म्हणाल्या, खरंतर या काळात तरी वृद्धाश्रमाची गरज पडायला नको. माता-पित्यांची आपण सेवा करू तर आपली मुलंदेखील आपली सेवा करतील. वृद्धांची सेवा हीच ईश्वर सेवा असून या वृद्धाश्रमातून देखील वृद्धांची चांगली सेवा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी या आश्रमासाठी वेळोवेळी आपण मदत केली असून यापुढे देखील सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. विश्वभारती सेवा संस्थेतर्फे गरजू मुलांना मान्यवरांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक सरपंच शंकर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पूर्वा दोंतुलवार यांनी तर आभार मिलिंद खोंड यांनी मानले.