जिद्द आणि चिकाटीने संघर्ष करा, यश नक्की मिळेल- ब्राह्मणवाडे

खरपुंडी येथे कबड्डी स्पर्धेचा समारोप

गडचिरोली : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी ठेवून सातत्याने संघर्ष करा, असा मुलमंत्र गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी युवकांना दिला. गडचिरोली तालुक्यातील मौजा खरपुंडी येथे कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

खरपुंडी विरुद्ध जपतलाई संघात झालेल्या अंतिम सामन्यात जपतलाई संघ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. विजेत्या संघाला रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष दिवाकर निसार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, ढिवरू मेश्राम, सुधीर बांबोळे, ज्येष्ठ नाटककार राज ठाकरे, कमलेश खोब्रागडे यांच्यासह सहभागी खेळाडू आणि गावातील क्रीडाप्रेमी युवक, महिला, पुरुष उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ब्राम्हणवाडे म्हणाले, सध्याचा काळ हा संघर्षाचा आहे. सहज आणि आयते कोणालाच मिळत नाही. क्षेत्र कोणतेही असले तरी स्पर्धेत टिकायचे असल्यास सातत्याने प्रयत्न करावेच लागेल. आयुष्यात यश अपयश मिळत असते, मात्र अपयशाला खचून न जाता, परत जिद्दीने पुढील कार्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.