आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेचा गुरूवारी शुभारंभ

खा.अशोक नेते यांनी घेतला तयारीचा आढावा

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या पाच दिवसीय भव्य यात्रा उत्सवाला गुरूवारी (दि.२२) सुरूवात होणार आहे. यात्रेच्या पाच दिवसात विविध राज्यातील लाखो भाविक कचारगडमध्ये येतात. त्याच्या तयारीचा आढावा खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या आढावा बैठकीला गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

समस्त आदिवासी समाजाचे आराध्य दैवत् समजल्या जाणाऱ्या माँ काली कंकाली कृपाल लिंगो, महागोंगो कोयापुनेम महापुजेनिमित्त कचारगड यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा दि.२२ ते २६ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान भरणार आहे. कचारगडच्या गुहेत यात्रा उत्सवादरम्यान दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून भाविक येत असतात. या पाच दिवसात लाखो भाविक कचारगडमध्ये दाखल होतात.

येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, खाणपाण, बसेस आणि रेल्वेची व्यवस्था, वीज पुरवठा, पोलिस बंदोबस्त, वाहनांची पार्किंग व्यवस्था, विश्रांतीची, निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृहे, केरकचऱ्याची विल्हेवाट, पथदिवे, ॲम्बुलन्स, आरोग्य तपासणीची व्यवस्था अशा विविध विषयांवर खासदार नेते यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला.

आढावा बैठकीला प्रामुख्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्राजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुर्गनाथम एम, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, देवरीचे उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, पोलीस निरीक्षक बोराडे, भाजपचे लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, भाजपचे सालेकसा तालुकाध्यक्ष गुमानसिंग उपराडे, आदिवासी नेते तथा कचारगढ चेतना समितीचे दुर्गाप्रसाद ककोडे, आदिवासीचे नेते शंकरलाल मडावी, हनुमंत वट्टी, तसेच मोठ्या संख्येने अधिकारी व नागरिक उपस्थित होते.