177 बालकांना कुपोषणाच्या जबड्यातून ‘कवसेर’ने काढले सुरक्षितपणे बाहेर

जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट

गडचिरोली : कुपोषणमुक्त गडचिरोलीकरीता राबविण्यात येत असलेल्या ‘कवसेर’ या उपक्रमात मागील 30 दिवसांचा आढावा घेण्यात आला. त्यात तीव्र कुपोषित श्रेणीतील एकुण 615 बालकांपैकी 177 बालकांमध्ये सुधारणा घडून आल्याचे दिसले. तसेच 167 दुर्धर आजारी बालकांपैकी 74 बालकांवर उपचार करण्यात आले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने सादर केला आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून कुपोषणमुक्त गडचिरोलीकरीता दोन टप्प्यात ‘प्रोजेक्ट कवसेर’ राबविण्यात येत आहे. प्रथम टप्प्यात 1 मे ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमधील बालकांना तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित श्रेणीमधुन मुक्त करणे, तर 16 ऑगस्ट ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये द्वितीय टप्प्यात वजनानुसार तीव्र व मध्यम कुपोषीत श्रेणीमधुन मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या उद्दीष्टांच्या पुर्ततेकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग तथा आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने सुरवातीला 6 मे ते 16 मे 2024 या कालावधीत अंगणवाडी केंद्रांमधील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे वजन, उंची घेऊन तथा आरोग्य तपासणी करुन निदानात्मक अभियान राबविण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्यात सर्वात जास्त धोका असणाऱ्या म्हणजेच तीव्र कुपोषित श्रेणीतील बालकांना ग्राम बाल विकास केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, बाल उपचार केंद्रामध्ये दाखल करुन आहार, आरोग्य सुविधा, कुटूंब मार्गदर्शन याद्वारे बालकांच्या आरोग्य व आहारामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. तसेच अंगणवाडी आपल्या दारी, पोषण जागर यासारखे उपक्रम राबवुन कुपोषण निर्मुलनासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांचा व बालकांवर झालेल्या परिणामांचा 30 दिवसांचा आढावा (16 मे ते 15 जुन 2024) घेतला असता 177 बालकांमध्ये सुधारणा घडून आल्याचे दिसून आले.

याशिवाय जिल्हयातील कुपोषणाला आळा घालण्याकरिता सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून पेसा / सर्वसाधारण क्षेत्रातील अंगणवाडी केन्द्रातील स्तनदा माता यांना बाळंतविडा किट व सर्वसाधारण क्षेत्रातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना महिन्यातून 25 दिवस याप्रमाणे 300 दिवस प्रतीबालक 1 अंड देण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडयांच्या बळकटीकरणाकरिता 4 अंगणवाडी इमारतीची बांधकामे सुरु आहेत. आणखी 10 अंगणवाडी इमारतींचे बांधकाम प्रस्तावित असल्याचे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) अर्चना इंगोले यांनी सांगितले.