गोंडी भाषेच्या संरक्षण व संवर्धनासाठी विद्यापीठात झाली राष्ट्रीय कार्यशाळा

काय म्हणाले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू?

गडचिरोली : गोंडी भाषा ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे, ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. जगातील अनेक भाषा रोज मृत्यूप्राय होत असून त्या भाषा वाचविणे आवश्यक आहे. गोडी भाषेचे संरक्षण म्हणजे भारतीय संस्कृतीचे, भारतीय ज्ञान परंपरेचे संरक्षण आहे. आदिवासींचे समृद्ध असे परंपरागत ज्ञान टिकवून ठेवायचे असेल तर गोंडी भाषेचा शब्दकोश तयार करून त्याचे मानकिकरण होणे आवश्यक आहे, असे मनोगत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नवी मुंबईचे कुलगुरू डॅा.के.एल.वर्मा यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठातील आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे गोंडी भाषेच्या संरक्षण व संवर्धनासाठी सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॅा.वर्मा बोलत होते.

या कार्यशाळेत तेलंगना, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील गोंडी भाषेतील तज्ज्ञ सहभागी झाले होते. कार्यशाळेत महाराष्ट्रातील १७ हजार ८६६ तर तेलंगणातील १३ हजार १५० गोंडी भाषेतील शब्दांचे संकलन करण्यात आले.

यावेळी छत्तीसगडचे समन्वयक सुब्रांशु चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, गोंडी भाषेचे संरक्षण करणे व गोंडी भाषेतील परंपरागत ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ कटीबद्ध असून त्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठात गोंडी भाषा स्पिकिंग कोर्सचे सर्टिफिकेट कोर्स व डिप्लोमा कोर्स सुरु केले आहे. तसेच आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून विविध कार्यक्रम सुरु केले असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाच्या समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.श्याम कोरेटी, डॉ.देवाजी तोफा उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कार्यशाळेचे समन्वयक डॉ.नरेश मडावी यांनी, तर आभार आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.वैभव मसराम यांनी मानले.

– तर आदिवासींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल

गोंडी भाषेतून शिक्षण मिळाले तर आदिवासींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी गोंडी भाषेचा शब्दकोश तयार करून त्याचे मानकिकरण होणे आवशक आहे, त्यानंतरच गोंडी भाषेतून पुस्तके लिहिली जातील. गोंडी भाषेतून शिक्षण दिल्या जाईल. गोंडी भाषेत अनेक पुस्तकांचे अनुवाद केल्या जाईल. गोंडी भाषा आपली मातृभाषा आहे, आपल्या मातृभाषेला वाचविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवशक आहे. तसेच लहान मुलांना गोंडी बोलायला प्रेरित करणे आवशक आहे. यासोबतच गोंडी भाषेच्या लिपीचेही मानकिकरण होणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॅा.वर्मा म्हणाले.