‘मोहाची पुरणपोळी खाऊया…, मामाच्या गावाला जाऊया…’

'ग्रिन्स'च्या निसर्ग संस्कार शिबिराची सांगता

गडचिरोली : मोबाईल रिल्सच्या युगात मुलांचं मामाचं गाव हरवलं आहे. ही कमतरता काही प्रमाणात दूर करण्यासह बालकांवर निसर्ग संस्कार करण्यासाठी ग्रिन्स संस्थेच्या वतीने मागील 5 वर्षांपासून ‘मामाच्या गावाला जाऊया’ हे अनोखे शिबिर नियमित आयोजित करण्यात येत आहे. यंदाही या शिबिराला बच्चेकंपनीने ‘मोहाची पुरणपोळी खाऊया, मामाच्या गावाला जाऊया’ असा नारा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची संस्था असलेल्या गोंडवाना सैनिकी विद्यालयात आयोजित या तीन दिवसीय शिबिरात ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी प्रश्न तुमचे, उत्तर आमचे या सत्रात बच्चे कंपनीशी संवाद साधत मानवी उत्क्रांतीवादापासून भौगोलिक, खगोलीय घटना ते अंधश्रद्धांपर्यंतच्या विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर, गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, युवा निसर्ग अभ्यासक डॅा.लोकेश तामगिरे यांच्या मार्गदर्शनात बालकांनी पक्षीनिरीक्षण करत 32 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद केली.

ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष तथा आर्ट आॅफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका अंजली कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात टाकाऊ वस्तूंचा वापर करत मुलांनी विविध कलाकृती साकारल्या. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी शिबिराला भेट देत बच्चे कंपनीशी मनमोकळा संवाद साधताना आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडिया या निसर्ग संस्थेचे मुकेश भांदककर यांनी संस्थेचे एलईडी स्क्रिनयुक्त विशेष वाहन पाठवून रंजक निसर्गपट दाखवले. खगोल अभ्यासक ऋतुराज मावळणकर, कपील पांडव यांनी खगोलीय ज्ञान देतानाच टेलिस्कोपद्वारे आकाशदर्शन घडवले. डॅा.विनोद बिटपल्लीवार यांनी लँडस्केपींगसह विविध रंग हाताळण्याचे कौशल्य मुलांना शिकवले. वाकडी येथील रोपवाटीकेत कृषी पर्यवेक्षक विजय पत्रे यांनी शिबिरार्थ्यांना वृक्षांच्या विविध प्रजाती, त्यांची ओळख, संगोपन, अशी विविध प्रकारची माहिती रंजक पद्धतीने दिली. प्राचार्य शमशेरखान पठाण, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, सतीश चिचघरे, प्राचार्य डॅा.वंदना मुनघाटे, डॉ.सुरेश लडके, स्मिता लडके, प्राचार्य कामडी, वनपरीक्षेत्र अधिकारी नितीन हेमके आदींनी शिबिराला सदिच्छा भेट देत बालकांशी संवाद साधला.

या शिबिरादरम्यान लगोरी, गलोल, कंचे, चव्वा-अष्टा, धाबाधुबी असे विस्मरणात गेलेले अनेक रंजक खेळ खेळण्यात आले. अंजली कुळमेथे, मिलिंद उमरे यांच्या नेतृत्वात आयोजित या शिबिरासाठी ग्रिन्स संस्थेचे प्राचार्य सुधीर गोहणे, सेवानिवृत्त प्राचार्य शेमदेव चाफले, राजेश इटनकर, मीरा बिसेन-चौधरी, प्राचार्य डॅा.राजाभाऊ मुनघाटे, सुभाष धंदरे, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, खुशाल ठाकरे तसेच पं.जवाहलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, विद्याभारती विद्यालय, प्रज्ञा संस्कार कॅान्व्हेंट, भगवंतराव हिंदी हायस्कूल, वसंत विद्यालय, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गट्टा व गुंडापल्ली येथील आश्रमशाळा आदींनी सहकार्य केले.

शेवटच्या दिवशी साग्रसंगीत जेवणासह मोहफुलांची पुरणपोळी बालकांना देत या शिबिराची गोड सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी होणारे अशा प्रकारचे हे एकमेव शिबिर आहे.

मामाच्या गावातून आई-बाबांना पत्र…

आजच्या मोबाईल व्हाट्सअॅपच्या युगात पत्रलेखन जवळपास थांबलेच आहे. आजच्या पिढीतील बालकांना पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रांबद्दल ऐकीव माहितीसुद्धा नाही. त्यामुळे पत्रलेखनाचे संस्कार व्हावे, यासाठी मुलांकडून शिबिराचा फिड बॅक फार्म भरून न घेताना त्यांना एकेक पोस्टकार्ड देऊन मामाच्या गावातून आपल्या आई-बाबांना पत्र लिहिण्यास सांगण्यात आले. तीन दिवसांत मामाच्या गावात काय धमाल केली, काय शिकलो, काय आवडले, काय नाही आवडले हे सगळं बालकांनी लिहिलं. हे पोस्टकार्ड या बालकांच्या घराच्या पत्त्यावर पोस्ट करण्यात येणार आहे.