गडचिरोली : गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात यावर्षी झालेल्या सातव्या आंबा महोत्सवात गडचिरोलीसह लगतच्या जिल्ह्यांमधूनही विविध प्रजातीच्या स्थानिक वाणांनी गडचिरोलीकरांना आकर्षित केले. यात काही वर्षापूर्वी नावारूपाला आलेल्या ‘कलेक्टर’ प्रजातीच्या आंब्यासोबत यावर्षी ‘सीईओ’ या आंब्यानेही भाव खात लक्ष वेधून घेतले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

डॅा.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, कृषी विभाग गडचिरोली, एकात्मिक फलोत्पादन विकास महामंडळ पुणे आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. हवामान बदलास अनुसरून गडचिरोली जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची, तसेच स्थानिक वाणांवी आणि आंबा पिकातील जैवविविधतेबद्दलची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, आंबा उत्पादनास व विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे आणि शास्त्रोक्त पद्धतीने आंबा लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने, तसेच आंब्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी या आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते.
या महोत्सवाच्या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून खासदार डॅा.नामदेव किरसान होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आंबा हे फळपिक अधिक उत्पन्न देणारे असून यापासून मिळणारा आर्थिक लाभ सुद्धा मोठा आहे. त्याअनुषंगाने आपत्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या स्थानिक गावरान आंब्यांवर संशोधन करुन त्या प्रजातींना मुख्य प्रवाहात आणून लागवडीला प्रोत्साहन द्यावे. गडविरोली जिल्हा हा आंब्याचा जिल्हा म्हणून नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना त्यांनी केली.
या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडविरोली जिल्ह्यात आंबा लागवडीसाठी भरपूर वाव असून या पिकाखालील क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कृषि विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, आणि कृषी विभागाने एकत्रित प्रयत्न करावे. स्थानिक प्रजातींना बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हा प्रशासन कायम आपल्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित पिकेव्हीच्या उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.देवानंद पंचभाई, फळशास्र विभाग प्रमुख डॅा.शशांक भाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ.किशोर झाडे यांनी प्रास्ताविकातून आंबा महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश सांगितला.
या कार्यक्रमाला अहेरीचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, देसाईगंजचे महेश परांजपे, गडचिरोलीचे महेंद्र गिरीपुंजे, जिल्हा मृद तपासणी अधिकारी गणेश भदाडे, सर्व तातुका कृषि अधिकारी व विषयतज्ज्ञ आणि कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या निलिमा पाटील, पी.ए. बोधीकर, डॅा.व्ही.एस.कदम, डॅा.पी.एन.चिरडे, एन.पी. बुद्धेवार, तसेच डी.डी.चवहाण, मोहीतकुमार गणवीर, अंकुश ठाकरे, शशिकांत सलामे यांनी विशेष मेहनत घेतली. दिडशेवर शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या संपूर्ण आंबा महोत्सवाचे सूत्रसंचालन विषयतज्ज्ञ एस.के.लाकडे यांनी केले.