गडचिरोलीला रेल्वेमार्गाने छत्तीसगड, तेलंगणाला जोडण्यासाठी सर्व्हेक्षण होणार

खासदार अशोक नेते यांची माहिती

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या भूगर्भात असलेल्या विविध प्रकारच्या खनिज संपत्तीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला रेल्वेमार्गाने तेलंगणा आणि छत्तीसगडला जोडण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या दोन्ही मार्गाच्या सर्व्हेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याचे माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. याशिवाय नागभिड, कामाटेंपा, चिमूर, वरोरा या नवीन रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षणाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील वडसा आणि लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव या दोन रेल्वे स्थानकांचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेत करण्यात आला. त्याअंतर्गत या स्थानकांमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करून त्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्या कामाचा शुभारंभ रविवार ६ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. सकाळी ९ वाजतापासून वडसा रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमाला सुरूवात होणार असून ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आॅनलाईन मार्गदर्शन करणार आहे. एकाचवेळी राज्यातील ४४ आणि देशातील ५०० स्टेशनवर हा कार्यक्रम होणार असल्याचे खा.नेते यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

गडचिरोलीला छत्तीसगडसोबत जोडण्यासाठी गडचिरोली-धानोरा-भानुप्रतापपूर (छत्तीसगड) तसेच तेलंगणाला जोडण्यासाठी गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा-अदिलाबाद या नवीन रेल्वे लाईनच्या कामाचे सर्व्हेक्षण होणार असल्याचे यावेली खा.अशोक नेते यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, महामंत्री गोविंद सारडा, आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव प्रकाश गेडाम, जिल्हा संपर्क प्रमुख कुथे, ज्येष्ठ नेते रमेश भुररे, सुधाकर येनगंधलवार, स्वप्निल वरघंटे, संजय बारापात्रे, अनिल कुनघाडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.