विकास कामांत अडचणी असल्यास सांगा, दूर करणार- ना.धर्मरावबाबा

पूरपरिस्थिती व जिल्ह्यातील कामांचा घेतला आढावा

अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेताना ना.धर्मरावबाबा आत्राम, सोबत भाग्यश्री आत्राम हलगेकर

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा राज्याच्या टोकावरील अतिदुर्गम जिल्हा असला तरी शासनाचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही कामात हलगर्जीपणा करू नका, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना केली. आपल्या खात्याचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी ना.धर्मरावबाबा यांचे शगडचिरोलीत आगमन झाले. यावेळी शासकीय विश्रामभवनात त्यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थिती तसेच विविध विकासकामांचा आढावा घेतला.

शासनाचे गडचिरोली जिल्ह्याला विशेष प्राधान्य आहे. हा जिल्हा पुढे गेला पाहिजे, त्याअनुषंगाने सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. येथील परिस्थिती तसेच दुर्गम भागात काम करताना अडचणी येत असल्या तरी अधिकारी आणि कर्मचारी योग्यरित्या काम करत आहेत. सर्व कामे व्यवस्थित झाली पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पावसामुळे जिल्ह्यात रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेताना ना.आत्राम म्हणाले, रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती तयार करुन तातडीने ती सादर करावी. तसेच बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची
दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी. नदीवर असलेल्या लहान-लहान पुलांविषयी माहिती घेऊन पुल उंचीबाबत किती निधी लागेल, माहिती देण्याची सूचना त्यांनी केली. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तसेच नवीन रस्त्यांच्या कामात अडचण निर्माण होत असेल तर अपल्याला अवगत करावे. वनविभागाच्या हरकती असल्यास वनमंत्र्यांशी बोलून ना-हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील रस्ते पावसामुळे खूप खराब झाले असून त्याबाबत माहिती संकलित करुन किती
निधी लागणार आहे, याची माहिती द्यावी, जेणेकरुन निधीची मागणी करता येईल. रस्त्यांच्या कामात भूसंपादनाची
अडचण निर्माण होत असल्यास त्याबाबतही कळवावे. सिंचन विहिरींबाबतही विचारणा करुन जिल्ह्यात निधीअभावी किती सिंचन विहिरी अपूर्ण आहेत, ही माहिती त्यांनी जाणून घेतली. निधीबाबत पाठपुरावा करुन तो मिळवून देण्यात येईल, असे सांगितले. पुरामध्ये झालेल्या नुकसानीची माहितीही जाणून घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.