12 कोटी रुपयांच्या निधीतून होणार अहेरी मुख्यालयातील रस्ते गुळगुळीत

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन

अहेरी : तालुका मुख्यालय असलेल्या अहेरी नगरातील चारही बाजुंनी जाणारे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठा निधी खेचून आणला आहे. त्यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित काही कामांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे अहेरी मुख्यालयी ये-जा करणाऱ्यांना सहन करावा लागणारा त्रास दूर होणार आहे.

पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यात अहेरी उपविभागातील बऱ्याच रस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अहेरी तालुका मुख्यालयातील चारही बाजूच्या रस्त्यांची अक्षरशः वाट लागली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निधी मंजूर करून आणला. मात्र निविदा प्रक्रिया होऊनही कंत्राटदार दिरंगाई करत होते. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ना.आत्राम यांनी फैलावर घेतले. त्यानंतर या रस्त्यांच्या कामाला गती आली आहे.

प्राणहिता ते अहेरी, आणि विठ्ठल रुखमाई मंदिर ते देवलमरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सुद्धा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विशेष प्रयत्न करून 12 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. या कामांचे भूमिपूजन ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते, आणि माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यात विठ्ठल रुक्माई मंदिर ते पुढे असे 4.50 कोटींच्या निधीतून 3 किलोमीटरचे काम केले जाणार आहे. पुढे गडअहेरी ते समोर 3 कोटी रुपयांच्या निधीतून 2 किलोमीटर रस्ता तर प्राणहिता ते अहेरीपर्यंत 4.50 कोटी रुपयांच्या निधीतून 3 किलोमीटरचे काम केले जाणार आहे.

भूमिपूजनप्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद दोंतुलवार, उपाध्यक्ष कन्हैय्यालाल रोहरा, जेष्ठ नागरिक मलरेड्डी बोम्मावार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आईंचवार, अरुण मुक्कावार, राकॉचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, नगरसेवक अमोल मुक्कावार, सुरेंद्र अलोने, आदित्य जक्कोजवार आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर.के. पारेलवार, सहाय्यक अभियंता श्रेणी -२ धम्मदीप रामटेके, कनिष्ठ अभियंता नागेश आडेपुवार उपस्थित होते.