दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी लॉयड मेटल्सने वाटले एक हजार हेल्मेट

अभिनेत्री नक्षत्रा आणि क्रिकेटर जितेश शर्मा यांची उपस्थिती

आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यात हेल्मेटच्या वापराबाबत नागरिक अजूनही जागरूक नाहीत. त्यामुळे दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण या जिल्ह्यात जास्त आहे. हे टाळण्यासाठी हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी, तसेच नागरिकांना हेल्मेटच्या वापराची सवय व्हावी या उद्देशाने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून एक हजार दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम १ जून रोजी आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात आणि नंतर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.

सिने अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि युवा क्रिकेटर जितेश शर्मा यांची उपस्थिती यावेळी विशेष आकर्षण होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दीप प्रज्वलन करून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजरातचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक एस.एस.खंडेलवाल, परिवहन अधिकारी मेश्राम, लॅायड्स मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पं.स.सदस्य हर्षवर्धन आत्राम, सरपंच शंकर मेश्राम आणि उपसरपंच विनोद अकनपल्लीवार यावेळी मंचावर उपस्थित होते.

वापर न केल्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार नागरिकांचा मृत्यू होतो. यामुळे हेल्मेट सक्तीसाठी जनजागृती देखील केली जात आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून हेल्मेट वापरले जात नाही. मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट अनिवार्यच असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेय.

हेल्मेटच्या वापरासोबत लायसन्सचीही तपासणी करा
यावेळी बोलताना आमदार धर्मरावबाबा म्हणाले, 2004 मध्ये मी परिवहन राज्यमंत्री असताना हेल्मेट सक्ती केली होती. मात्र पुणेकरांनी याचा विरोध केला होता. शेवटी हेल्मेटमुळे आपण किती सुरक्षित आहोत हे आता लोकांना कळायला लागले. घरचा कमावता व्यक्ती गेल्यास त्या कुटुंबाचे किती नुकसान होते, हे त्याच कुटुंबाला कळते.त्यामुळे हेल्मेट सक्ती आवश्यक आहे. सोबतच आपल्याकडे दुचाकी, चारचाकी वाहन असेल तर चालक परवाना सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम कळण्यासोबत बरेच फायदे आहेत. लॉयड मेटल्स कंपनीने हा स्तुत्य उपक्रम राबवून तब्बल 1 हजार हेल्मेट वाटप केले, याचा मला अभिमान असून यानंतर कंपनीकडून दुचाकी वाहनचालकांना आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून शिबिर घेऊन परवाने देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. हेल्मेट आणि लायसन्सच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याची सूचनाही त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना केली.

आयुष्याच्या पिचवर दीर्घकाळ टिकण्यासाठी हेल्मेट वापरा
यावेळी क्रिकेट जितेश शर्मा म्हणाले, आम्ही क्रिकेट खेळत असताना हेल्मेटचा वापर यासाठी करतो की, मैदानात कोणतीही दुखापत न होता आम्हाला दीर्घकाळ टिकायचे असते. त्याचप्रमाणे जीवनात स्वतःसोबत आपल्या परिवारासाठी दीर्घकाळ टिकायचे असेल तर बाईकस्वारांनी हेल्मेट वापरायला सुरुवात करावी, असा महत्त्वाचा संदेश दिला. या कार्यक्रमात सिने अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि एस. एस. खांडेलवाल यांनीही हेल्मेट वापर केल्यास कशा प्रकारे फायदा होतो, याबाबत माहिती देऊन युवा पिढीला मार्गदर्शन केले.

जितेश आणि नक्षत्राला पाहण्यासाठी एकच गर्दी
युवा क्रिकेटर जितेश शर्मा, तसेच सिने अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर यांचे आगमन होताच भामरागड रस्त्यावरील वनविभागाच्या विश्रामगृहात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या ठिकाणाहून वीर बाबुराव शेडमाके चौकापर्यंत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह शेकडो नागरिकांनी दुचाकी वाहनावर रॅली काढली. त्यानंतर सर्वच मान्यवर मंचावर पोहोचले. हेल्मेट वाटप कार्यक्रम आटोपल्यानंतर नागरिकांनी विशेष अतिथींसोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड केली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजवाड्यात पाहुण्यांच्या जेवणाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी सुद्धा सिने अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यासोबत फोटोसेशनसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.