अहेरी : अहेरी पंचायत समितीची आमसभा सोमवारी (दि.13) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अहेरी शहरातील अतिक्रण आणि रस्त्यांच्या विषयावर गरमागरम चर्चा झाली. धर्मरावबाबांनी काही अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
या आमसभेला प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, संवर्ग विकास अधिकारी राहुल वरठे, नायब तहसीलदार गुणवंत बाबीटकर, माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वरबाबा आत्राम, ज्येष्ठ नेते बबलू हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी तालुक्यातील रस्ते, पूल, वीज पुरवठा, सिंचन, शिक्षण, आरोग्य, घरकुल आदींचा आढावा घेऊन रेंगाळत असलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. यापुढे कामात दुर्लक्ष व हयगय खपवून घेतल्या जाणार नाही, असे म्हणत त्यांनी कानउघाडणी केली.
मागील एक वर्षापासून अहेरी शहरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. अहेरी शहरात अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षांपासून ठप्प पडला आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणीही आमसभेत लावून धरण्यात आली. त्यावर धर्मरावबाबांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचे संकेत दिले.
पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन कृषी योजनेमार्फत शेतकऱ्यांना योग्य सोयी-सवलत्या मिळाव्या आणि शासनाच्या विविध नावीन्यपूर्ण योजनांपासून कुणीही वंचित राहू नये, यावर ना.आत्राम यांनी भर दिला.
यावेळी अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेसचे रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, लक्ष्मण येरावार, नागेश मडावी, उपसरपंच किशोर करमे आदींनी रेंगाळत असलेले प्रश्न व विविध विकासात्मक कामांकडे लक्ष वेधले. आमसभेत अहेरी पंचायत समितीअंतर्गत विविध विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
जि.प.च्या इमारती न.पं.कडे हस्तांतरित करा
अहेरी नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगरातील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर पंचायतीकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे इमारतीची दुरुस्ती व देखभाल होत नाही. शहरातील अनेक अंगणवाड्या पूर्णतः जीर्ण झाल्यामुळे भाड्याच्या खोलीत शाळा भरविल्या जात आहे. जिल्हा परिषद शाळेच्या इमारती जीर्ण असल्यामुळे तिथेही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने नगर पंचायतीकडे अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्तांतरीत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी केली. त्याचप्रमाणे शेती व कृषीविषयक लाभापासून शेतकरी वंचित असल्याने नगर पंचायतीत स्वतंत्र कृषी खाते स्थापित करण्याकडेही अलोणे यांनी लक्ष वेधले.