राज्याच्या शेवटच्या टोकावरील गावात भाग्यश्री आत्राम यांनी घेतली चावडी सभा

विकासासाठी कटिबद्ध असल्याचा दिला शब्द

एटापल्ली : छत्तीसगडच्या सीमेवर वसलेल्या, राज्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम जवेली (बु.) येथे माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी जाऊन चावडी सभा घेतली. यावेळी त्यांनी अतिदुर्गम भागातील गावांत विविध विकासात्मक कामे करून गावाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द गावकऱ्यांना दिला.

यावेळी माजी जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुकाध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, येमलीच्या सरपंच ललिता मडावी, जवेली(बु)चे सरपंच दामजी रावजी हिचामी, उपसरपंच शाहू येसू पोटावी, जवेली (बु)च्या गाव पाटील तथा ग्रामसभा अध्यक्ष मुरा मनकु पोटावी, कन्हाळगावचे पाटील मनिराम नरोटे, ग्रामसभा अध्यक्ष ईश्वर नरोटे, सचिव नरेश परसा, कर्रेमचे गाव पाटील किशन इष्टम, ग्रामसभा अध्यक्ष माहू कोटामी, सचिव राजेश इष्टम, मेंढरीचे गाव पाटील वसंत नैताम, ग्रामसभा अध्यक्ष प्रसुर नैताम, सचिव संदीप नैताम, तसेच जवेली (बु) ग्रामपंचायतअंतर्गत पाच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून एटापल्ली तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील बऱ्याच गावांत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही विकासाचा सुर्योदय झाला नाही. जवेली (बु) ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावांची हीच स्थिती आहे. एटापल्ली ते जारावंडी मुख्य रस्त्यावरील फाट्यावरून तब्बल 4 ते 5 किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेले जवेली (बु) गाव वसले आहे. या ग्रामपंचायतअंतर्गत जवेली बु.मेंढरी, कर्रेम, कारका, कन्हाळगाव अशा 5 गावांचा समावेश आहे. या गावात जाण्यासाठी ना मुख्य रस्ता आहे, ना मूलभूत सुविधा. अश्या परिस्थितीत गावकऱ्यांनी नुकतेच अहेरी गाठून भाग्यश्री आत्राम यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जवेली (बु) येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून चावडी सभेच्या माध्यमातून गावकऱ्यांशी चर्चा केली.

पाच गावातील लोकांनी मांडल्या समस्या
यावेळी पाच गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडून निवेदनही दिले. त्या निवेदनात मुख्य रस्ता मंजूर करणे, विजेची समस्या सोडविणे, रेशन वेळेवर उपलब्ध करून देणे, पोलिसांकडून होणारा त्रास थांबविणे, शेती सपाटीकरण करून देणे, गोटूल बांधकाम करून देणे, सांस्कृतिक भवन मंजूर करणे, तसेच विविध विकासात्मक कामांसाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. भाग्यश्री आत्राम यांनी मूलभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. मुख्य रस्त्यावरून गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे. त्याअनुषंगाने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशीही त्यांनी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. भाग्यश्री आत्राम गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.