गडचिरोली : तो हरियाणाचा, तर ती गडचिरोली जिल्ह्याची रहिवासी. पण नक्षल चवळळीच्या निमित्ताने ते ओडिशा राज्यात एकत्र आले. तिथेच त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांना सुखी संसाराची स्वप्नं पडू लागली. पण नक्षल चळवळीत राहून हे स्वप्न पूर्ण करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी हिमाचल प्रदेश गाठून चळवळीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र हातून घडलेले गुन्हे आणि असुरक्षित वातावरणातून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर आत्मसमर्पणाशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि शेवटी त्या दोघांनी महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्राधान्य देत गडचिरोली गाठले.
ही कहाणी आहे नक्षल चळवळीत एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर काम केलेल्या असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत (37 वर्ष) आणि दलम सदस्य म्हणून काम केलेल्या अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता (28 वर्ष) या नक्षल दाम्पत्याची. त्यांच्यावर एकूण 8 लाखांचे इनाम होते. दोघांनी शनिवारी गडचिरोली गाठून सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. व्यक्ती कितीही हिंसाचारी असली तरी प्रेमाने जीवनात किती बदल होऊ शकतो याचे हे नक्षल दाम्पत्य उदाहरण ठरले आहे.
अनिल हा मुळचा हरियाणातील जिंद जिल्ह्याचा रहिवासी. शालेय जीवनात बालदस्ता या संघटनेमध्ये त्याची विशेष रुची होती. जागृत छात्र मोर्चामध्ये राज्य समिती सदस्य म्हणून त्याने उत्तर प्रादेशिक ब्युरोसाठी काम केले. सन 2006 मध्ये माड एरिया प्रेस टिममध्ये भरती होऊन सन 2011 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता. त्यानंतर त्याची कंपनी 10 मध्ये बदली होऊन सन 2013 पर्यंत एसीएम पदावर होता. सन 2013 मध्ये कंपनी 10 मधून प्रेस टिम (ओडिशा) मध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत तिथे कार्यरत होता. याचवेळी तो सोनियाच्या संपर्कात आला. त्यामुळे 2018 दोघांनीही नक्षल चळवळीपासून दूर राहण्यासाठी हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातले सुन्नी हे गाव गाठले आणि तिथे संसार सुरू केला होता. अनिल याच्यावर चकमकीचे 2 गुन्हे आहेत.
मुळची धानोरा तालुक्यातील गुरेकसा या गावची सोनिया हिने 2007 मध्ये टिपागड दलममध्ये कमांडर दिनकर याची मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सन 2008 मध्ये राही दलममध्ये बदली होऊन जून 2009 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. सन 2010 ते 2012 पर्यंत माड एरीयातील मौजा घमंडी (छ.ग.) गावात जनताना सरकारच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणूनही तिने काम केले. सन 2012 मध्ये कंपनी क्र.10 मध्ये बदली होऊन 2013 पर्यंत सदस्य पदावर तिथे कार्यरत होती. सन 2013 ते 2018 पर्यंत ओडिशा राज्यात बदली होऊन प्रेस टिममध्ये हिंदी आणि गोंडी भाषेत टंकलेखनाचे काम केले. त्यानंतर अनिलसोबत विवाह करून तिने हिमाचल गाठले. तिच्यावर चकमकीचे दोन गुन्हे आहेत.
असुरक्षित वातावरणातून झाली सुटका
अनिल आणि सोनिया यांनी हिमाचल प्रदेशात संसार तर सुरू केला, पण कोणतेही शासकीय ओळखपत्र नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कधीही आपले मूळ नाव उघडकीस येऊन अटक होण्याची भिती त्यांना वाटत होती. सतत खरी ओळख लपवून राहणे आणि खोटे बोलणे अशक्य झाले होते. गडचिरोलीत सशस्त्र संघटनेत काम केले असल्यामुळे व इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्याची आत्मसमर्पण योजना सर्वात चांगली वाटल्यामुळे त्यांनी अखेर गडचिरोली गाठून आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेण्यासोबत असुरक्षित वातावरणातून आपली सुटका करण्याचा निर्णय घेतला.
सन्मानाने जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करा
आजपर्यंत एकुण 676 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. सन 2022 ते 2024 या काळात आतापर्यंत 29 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. कालचे आत्मसमर्पण विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या रेंज फिल्ड टिमचे उपकमांडंट सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास ईच्छुक असतील त्यांना लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.