बौद्ध विहारातून प्रशासकीय अधिकारी घडावेत!

बोरीतील विहाराच्या भूमिपूजनप्रसंगी आ.धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

अहेरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणातून समाजाचा व देशाचा कायापालट केला. बौद्ध विहार केवळ धार्मिक ठिकाणे न राहता ज्ञानाची केंद्रे व्हावीत. यातून अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री आ.धर्मरावबाबा यांनी व्यक्त केली. अहेरी तालुक्यातील बोरी येथे बौद्ध विहाराच्या भूमिपूजनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

आ.धर्मरावबाबा यांच्या स्थानिक विकास निधीतून या विहाराची उभारणी केली जाणार आहे. बुधवारी झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरीचे सरपंच शंकर कोडापे, तर अतिथी म्हणून मंचावर बौद्ध समाजाचे अध्यक्ष गोपाळा चांदेकर, उपसरपंच पराग ओलाल्लवार, राजपूर पॅचच्या सरपंच मिना वेलादी, महेश बाकीवार, सुरेंद्र अलोणे, अशोक वासेकर, विजय कोकिरवार, नागेश पुल्लीवार, राहुल फुलझेले, लिंगाजी दुर्गे, साईनाथ अलवलवार, महेश सेडमाके, साईबाबा मड़ावी, कार्तिक कुक्कूडकर आदी उपस्थित होते.

यावेळी धर्मरावबाबा यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा मूलमंत्र दिला. प्रत्येकाने उत्तमोत्तम शिक्षण घ्यावे आणि बौद्ध विहारातून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मी राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री असताना महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे व मागासवर्गीय समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. विहाराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती दान करणार असल्याचे धर्मरावबाबा म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन पांडुरंग रामाटेके यांनी केले. यावेळी पेंटू अलोणे, लक्ष्मण तावाड़े, दिलीप सोनटक्के, दिलीप झाडे, राजेश दुर्गे आणि मोठ्या संख्येने बौद्ध समाजबांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.