गडचिरोली : जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला अधिक गती मिळावी, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विकास कामांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
या भेटीत जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, रस्ते विकास, पर्यटन आणि औद्योगिक प्रगतीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मा.खा.डॉ.नेते यांनी सादर केलेल्या निवेदनात गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सी (साकोली–लाखांदूर–वडसा –आरमोरी–गडचिरोली– आष्टी–आलापल्ली–सिरोंचा) या महत्त्वाच्या मार्गाच्या उर्वरित कामांना गती देण्याबरोबरच नारायणपूर– आलापल्ली (NH-130 D) जोडणी मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली.
यासोबतच जिल्ह्यातील इतर प्रलंबित रस्ते, पूल आणि दळणवळणाशी संबंधित प्रकल्पांसाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, निधी आणि वनविभागाच्या परवानग्या तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंतीही करण्यात आली.
गडचिरोलीच्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय अधिक सक्षम करण्याची मागणीही मा.खा.डॉ.नेते यांनी केली. या रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी, आधुनिक वैद्यकीय उपकरणे तसेच पायाभूत सुविधांची तातडीने उपलब्धता करून देण्यात यावी, जेणेकरून अहेरीसह संपूर्ण दक्षिण गडचिरोलीतील महिला, माता आणि बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर मिळू शकेल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.
टाटा समुहाचे जिंजर हॅाटेल सुरू होणार
गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या टाटा समूहाच्या जिंजर हॉटेल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावा, अशी विनंतीही डॉ.नेते यांनी केली. हा प्रकल्प गडचिरोलीच्या पर्यटन, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ.नेते यांनी मांडलेल्या सर्व मागण्या आणि विकासविषयक मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकास कामांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, तसेच अॅड.संदीप धाईत प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.अशोक नेते यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक बाब शासनाच्या निदर्शनास सातत्याने आणून ती मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न कायम राहील. जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, पर्यटन, उद्योग आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून गडचिरोलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
































