आरमोरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांचा अभूतपूर्व सन्मान मेळावा

महिलांनी आर्थिक उन्नती साधावी-ना.आत्राम

आरमोरी : पूर्वीच्या काळाप्रमाणे आधुनिक युगात महिला ही चूल आणि मूल यापुरती मर्यादित न राहता महिलांनी शासनाच्या विविध महिलांच्या योजनांचा उपयोग करून सामाजिक व आर्थिक क्षेत्रात प्रगती साधावी, तसेच सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील केमिस्ट भवनमध्ये घेण्यात आलेल्या महिला सन्मान मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख किशोर तलमले, माजी प्रदेश संघटन सचिव युनिस शेख, गडचिरोलीच्या युवती शहराध्यक्ष श्रेया कोष्टी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, आरमोरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अमिन लालानी, कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, आरमोरी महिला तालुका अध्यक्ष वृषाली भोयर, महिला शहर अध्यक्ष संगीता मेश्राम, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष दीपक बैस, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवानंद बोरकर, वडसा तालुका अध्यक्ष संजय साळवे, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरूष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याला मार्गदर्शन करताना ना.आत्राम म्हणाले, महिला सशक्तिकरणाचा शुभारंभ खास महाराष्ट्राच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यातून करण्यात आला आहे. महिलांच्या योजनांसाठी पुढील काळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे मेळावे घेणार असून महिलांना सर्वतोपरी आरक्षण देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आरमोरी येथे प्रथमच महिला मेळावा घेतला, तो अभूतपूर्व ठरल्याचे ना.धर्मरावबाबा म्हणाले.

यावेळी मार्गदर्शन करताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देण्यात येईल, घरघर पाणी व्यवस्था कशी करण्यात येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात अतिक्रमणधारकांना वनपट्टे देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नाना नाकाडे यांनी महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष सुनील नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक महिला तालुकाध्यक्ष वृषाली भोयर यांनी, तर आभार शहर अध्यक्ष प्रदीप हजारे यांनी मानले. या मेळाव्यात अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी हेमराज प्रधान, राजू आकरे, सुरेंद्र बावणकर, योगाजी थोराक, नरेश ढोरे, प्रफुल राचमलवार, सुनील ढोरे, रवींद्र दुमाने, गणेश मंगरे, उदाराम दिघोरे, अनिल अलबनकर, उज्वला मंगरे, जयश्री भोयर, उर्मिला हर्षे, नलू आत्राम, गायत्री भोयर, अरुणा भोयर, कोकिळा गरफडे, मंजुषा हूड, इंदिरा हूड, गीता सपाटे, सारिका बांबोळे, डिम्पल बांबोळे, प्रमिला भोयर यांनी परिश्रम घेतले.