मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोलीस दलाकडून बळ

कार्यशाळेत केले पुस्तकांचे वाटप

गडचिरोली : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी गडचिरोली पोलिसांच्या वतीने त्यांची एक दिवसीय कार्यशाळा घेऊन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील शिक्षण सोडलेल्या युवक-युवतींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा गडचिरोली पोलीस दलाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यशाळेसाठी अतिदुर्गम भागातील 422 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले होते. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणा­ऱ्या उपक्रमांचा एक भाग म्हणून 1 एप्रिल 2025 रोजी गडचिरोली पोलीस दल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा व पुस्तक वाटप कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य सभागृहात पार पडला.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारा स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास केंद्रांच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठामध्ये बी.ए.च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणारे 422 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश हे उपस्थित होते.

या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना सायबर अपराधांबाबत माहिती देऊन सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी उपयुक्त अशा सूचना देण्यात आल्या. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना सायबर साक्षर होण्याविषयी शपथ देखील देण्यात आली.

आतापर्यंत 2529 विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शिक्षणाच्या अपु­ऱ्या सोयी-सुविधा, तसेच शिक्षण सोडलेल्या युवक-युवतींसाठी सन 2018 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याशी समन्वय साधून गडचिरोली पोलीस दलाने मुरुमगाव, एटापल्ली, ताडगाव, पेंढरी व जिमलगट्टा या 5 ठिकाणी अभ्यास केंद्रांची स्थापना केली आहे. या 5 अभ्यास केंद्रांच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत एकूण 2529 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना पुढील शिक्षण पूर्ण करुन आजच्या प्रगत युगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, सायबर पोलीस ठाण्याच्या पोउपनि. नेहा हांडे व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.