अहेरी : भातपीकाच्या बियाण्यांच्या पिशवीत अनधिकृतपणे कापसाचे एचटीबीटी हे प्रतिबंधित कापूस बियाणे ठेवून विक्री केल्या जात असल्याचा प्रकार अहेरी तालुक्यातील मुत्तापूर येथे उघडकीस आला. कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने ते बियाणे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. यात 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, मुत्तापूर येथे एका शेतकऱ्याच्या घरी तेलंगणातील विक्रेत्याने प्रतिबंधित बीटी कापूस बियाणे (60 किलो) ठेवले असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कृषी विभाग व पोलीस विभागाने त्या ठिकाणी धाड टाकली. तपासणी केली असता भाताच्या पिशवीमध्ये संशयास्पद कापूस बियाणे आढळून आले. संबंधित साठवणूकदार तसेच इतर जबाबदार व्यक्तींवर पोलीस स्टेशन अहेरी येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हाधिकारी अविश्यां पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, विभागीय कृषी सहसंचालक (नागपूर) उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे (गुण नियंत्रण, नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली
अहेरीचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, जि.प.चे मोहीम अधिकारी आनंद पाल व कृषी अधिकारी (पंचायत समिती अहेरी) भगवान गावडे, तसेच पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे यांनी केली.