गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. समाजकल्याण विभागाच्या सिरोंचा, वांगेपल्ली (अहेरी) आणि नवेगाव (गडचिरोली) येथील निवासी शाळांमधील 120 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विमान प्रवासाद्वारे बंगळूरु येथील इस्रो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी उड्डाण केले.
विशेष म्हणजे यातील अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी साधी रेल्वेही पाहिली नव्हती. काहींनी तर जिल्ह्याचे मुख्यालयही पाहिले नव्हते. त्यांच्या या स्वप्नवत प्रवासाला राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. (अधिक बातमी खाली वाचा)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ते कुठे जात आहेत, कसे जाणार आहेत आणि काय पाहणार आहेत, असे आपुलकीने विचारले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खूप खूप अभ्यास करण्याचा सल्ला देत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आदिवासी विकास मंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड यांनीही विमानतळावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.सचिन मडावी यांच्या संकल्पनेतून साकारली योजना
या अभिनव उपक्रमाची संकल्पना सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) डॉ.सचिन मडावी यांनी मांडली होती. जिल्हाधिकारी पंडा यांनी त्यास तत्काळ मंजुरी दिली. तसेच पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केला. गडचिरोली येथून या विद्यार्थ्यांना बसद्वारे हिरवी झेंडी दाखवून नागपूर विमानतळावर रवाना करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी चेतन हिवंज याप्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणी त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू पाहायला मिळाले.
इस्रोला पहिल्यांदा भेट
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था असून, उपग्रह, रॉकेट आणि अवकाश तंत्रज्ञान विकासासाठी कार्यरत आहे. जगभरात भारतीय अंतराळ प्रगतीचे प्रतीक म्हणून इस्रोची ओळख आहे. अशा या संस्थेला पहिल्यांदाच गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विद्यार्थी भेट देणार आहेत.