आलापल्ली : विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने जाहीरनाम्यात खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत, सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)च्या वतीने सोमवारी (दि.23) आलापल्लीत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
पक्षाच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या आंदोलनात ‘क्या हुवा तेरा वादा?’ असा प्रश्न राज्य सरकारला केला जाणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांमध्ये धानाला हेक्टरी 25 हजार रुपये बोनस, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना 15 हजार मानधन, ग्राम रोजगार सेवकांना 8 हजार मानधन, लाडकी बहिणींना प्रतिमहिना 2100 रुपये, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्ममाफी, घरगुती वीजबिल 80 टक्के माफ करणार आणि रासायनिक खतांवरील भार कमी करणार अशी सर्व आश्वासने खोटी ठरल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आला आहे.

याशिवाय स्थानिक पातळीवर अनेक मागण्या या आंदोलनाच्या निमित्ताने केल्या जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले.