
गडचिरोली : शहरालगतच्या मुरखळा येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेला झालेला तीव्र विरोध लक्षात घेऊन अखेर त्या ठिकाणी विमानतळा उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. ज्या जागेला नागरिकांचा विरोध नसेल अशा नवीन जागेत हे विमानतळ उभारले जाईल, अशी ग्वाही सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.
प्रस्तावित विमानतळासाठी चार महिन्यांपूर्वी जी जागा निश्चित केली होती त्यात 6 गावांमधील 352 मालमत्ताधारक शेतकरी, नागरिक, ग्रामपंचायतींची जमीन जाणार होती. त्यासंदर्भात एसडीओ रणजित यादव यांनी जाहीरनामा काढून नागरिकांचे आक्षेपही मागविले होते. अनेक शेतकऱ्यांची सुपिक जमीन त्यात जाणार असल्याने मुरखळा, पुलखल, नवेगाव, मुडझा (बु), मुडझा (तु), कनेरी येथील नागरिकांनी आणि ग्रामपंचायतींनी त्या ठिकाणी विमानतळ उभारणीसाठी विरोध केला होता. मुरखळा गावचे पोलीस पाटील शरद ब्राह्मणवाडे यांनी उपोषणही केले होते. (अधिक बातमी खाली वाचा)

अखेर जनभावना लक्षात घेऊन विमानतळाची ती नियोजित जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली असल्याचे सहपालकमंत्री जयस्वाल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.