चामोर्शी : चामोर्शी ते हरणघाट या अतिशय दुरवस्था झालेल्या मार्गावरून जाणाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार होणारे अपघात आणि दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी व रुग्णांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने सोमवारी भेंडाळा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व काँग्रेसचे चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले. या आंदोलनात परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांनीही सहभागी होऊन आपल्या त्रासाला वाचा फोडली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगत यांनी हे काम थातरमातुर केल्यास गप्प बसणार नाही, असे सुनावले. तर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढल्याचे सांगत सामान्य जनतेच्या हालअपेष्टा व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले असताना देखील प्रशासन झोपेत असल्याचा आरोप करत येत्या 10 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास चामोर्शीत महाआंदोलन करण्याचा इशारा दिला. उपविभागीय अभियंता बड्डे यांनी आंदोलनस्थळी येऊन हे काम तातडीने सुरू करत असल्याचे सांगितले.
या आंदोलनात आझाद पार्टीचे प्रभारी हंसराज उराडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड यांच्यासह खुशाल मरसकोल्हे, सोनाक्षी लभाने, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, सतीश दुर्गमवार, सोनू कुमरे, प्रेम मडावी, धनराज दामले, नितेश वेसकडे, मोसम मेश्राम, तसेच काँग्रेसचे दिलीप वनकर, राजेश ठाकूर, निकेश गद्देवार, प्रेमानंद गोंगले, हेमंत कोवासे, राहुल पोरतेट तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.