गडचिरोली : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या 10 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गोदावरी नदीतून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पोहोचत असल्याने नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. हे पाणी असरअली, गुमलकोंडा भागात पोहोचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी तातडीने आढावा बैठक घेऊन सिरोंचा तालुक्यातील यंत्रणेने नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर व गरजेप्रमाणे नागरिकांना आश्रयगृहात ठेवण्याचे, तसेच आरोग्य सुविधा व एसडीआरएफ पथके तैनात ठेवण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे उपस्थित होते. तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीरामसागर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठची गावे धोक्याच्या क्षेत्रात येऊ शकतात. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून काही महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात असले सूचविले.
नागरिकांचे स्थलांतर
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दवंडी देऊन सतर्क करणे व आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले. यासाठी महसूल, पोलीस व वनविभागाने परस्पर समन्वय साधावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
एसडीआरएफ पथके सज्ज
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एसडीआरएफ पथके सिरोंचा तालुक्यात तैनात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भामरागड मुख्यालयात असलेले पथकही तातडीने सिरोंचा तहसीलमध्ये हलविण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
अफवांवर नियंत्रण
पाण्याचा विसर्ग रात्रीच्या वेळी होणार असल्याने नागरिकांमध्ये भीती किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहून अफवांवर नियंत्रण ठेवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाची तयारी
पूरस्थितीनंतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने ब्लिचिंग पावडर व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, तसेच शेल्टर होममध्ये आरोग्य सुविधा तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करून नागरिकांचे प्राण व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.