कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळणार

मंत्रिमंडळ बैठकीत सुतोवाच

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले. त्यामुळे ज्यांचा कापणी केलेला धान पावसाच्या पाण्यात भिजला, अशा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (सविस्तर बातमी खाली वाचा)

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (दि.3) सह्याद्री राज्य अतिथीगृहावर झाली. या बैठकीच्या सुरवातीला राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरीलप्रमाणे सांगितले.

मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाव्दारे राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या 27 मे रोजी झालेल्या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरीता तातडीने करायच्या मदतीचा निधी द्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार 49 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यात नागपूर आणि अमरावती या विदर्भातील विभागांना सर्वात कमी, प्रत्येकी 10 कोटी असे एकूण 49 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

खरीप 2025 आणि यापुढील कालावधीकरिता केंद्र सरकार अथवा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी द्यावयाच्या भरपाईचे दर आणि निकष 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय राहतील, असे सोनिया सेठी यांनी सांगितले.