७५० पदांची भरती करून एफडीएचे बळकटीकरण करणार- ना.आत्राम

सहायक आयुक्त कार्यालयाची पायाभरणी

गडचिरोली : निरोगी आयुष्यासाठी उत्तम आहार महत्वाचा घटक आहे. कोरोनाच्या महामारीनंतर नागरिक स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. अन्नधान्यामध्ये भेसळ रोखण्यासाठी तसेच नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ व सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बळकटीकरण करणार, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

गडचिरोलीत सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या नवीन वास्तु उभारणीसाठी कोनशिला अनावरण आणि भूमीपूजन करताना ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी संजय मिना, सहआयुक्त विराज पौनीकर, कृष्णा जयपुरकर, सहायक आयुक्त अभय देशपांडे, सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे आदी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ, सुरक्षित व सकस अन्न मिळण्याची निकड लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास 750 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे यावेळी ना.आत्राम यांनी सांगितले. विभागाअंतर्गत ईट राईट ईनिशिएटीव्ह मोहिम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत कॉलेज कॅन्टीन, मंगल कार्यालय, लग्न समारंभ, कॅटरींग तसेच मंत्रालयीन कॅन्टीन या सर्व ठिकाणी परवाना घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सदर वास्तु लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगितले. तर आयुक्त अभिमन्यु काळे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे ध्येय व कार्याबद्दल माहिती देऊन शासनाकडून गडचिरोली जिल्हा कार्यालयासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

गडचिरोली येथे 33 हजार चौरस फुट इतका भुखंड या कार्यालयासाठी शासनाकडून मिळालेला आहे. वास्तु बांधकाम करण्याकरीता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने रुपये 7 कोटी इतके अनुदान मंजूर झाले आहे. कार्यक्रमाला अन्न व्यावसायिक व केमिस्ट बांधवही उपस्थित होते.