… तर ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडतील : भाग्यश्री आत्राम

देचली येथे टेनिस बॉल क्रिकेटचे उद्घाटन

अहेरी : शहरासारख्या सोयी-सुविधा, उत्तम मैदान नसतानाही प्रतिकुल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील तरुण विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात. एवढेच नाही तर योग्य मार्गदर्शन नसतानाही ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये चांगला खेळ खेळण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातूनही उत्तम खेळाडू घडतील, असा आशावाद माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केला.

शहीद पोलिस उपनिरीक्षक शशांक मलकापुरे यांच्या स्मरणार्थ देचली येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून सीआरपीएफचे असिस्टंट कमांडन्ट मोहम्मद शकील, प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी अधिकारी संजय तडवी, पीएसआय भारते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, अॅड.पंकज दहागावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमराज कुमरे, महेश पुप्पाला, तिरुपती सुंकरी, सतीश पणेला, सतीश कारेंगुला, रमेश आकुला, ताजू कुळमेथे, मखमुर शेख आदी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी भाग्यश्री आत्राम यांच्याकडून ४१ हजार रुपयांचे पारितोषिक, शहीद पोलीस उपनिरीक्षक शशांक मलकापुरे यांच्या स्मरणार्थ देचली पोलिस स्टेशनतर्फे ३१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषक तर ग्रामपंचायत सदस्य हेमराज कुमरे यांच्याकडून २१ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक व आकर्षक शिल्ड ठेवले. त्यामुळे या ठिकाणी परिसरातील बऱ्याच चमुंनी सहभाग घेतला.