भविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार, मंत्री धर्मरावबाबा यांचा विश्वास

लगाम येथे कार्यकर्त्यांकडून जाहीर सत्कार

मुलचेरा : महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे राज्याला देवेन्द्र फडणवीस, अजित पवार यांच्यासारखे अनुभवी नेते लाभले आहेत. त्यामुळे महराष्ट्रात न भूतो न भविष्य असा विकास कामांचा सपाटा सुरू आहे, असे सांगताना राज्य सरकारचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे ना.आत्राम यांचा कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार कार्यक्रम घेतला. त्यात ते बोलत होते. यावेळी माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, राकॉँचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, श्रीनिवास गोडशेलवार, राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार, लगामचे सरपंच दीपक मडावी, येल्लाचे उपसरपंच दिवाकर उराडे, माजी पं.स. सभापती नामदेव कुसनाके, प्राचार्य शैलेंद्र खराती, ग्रा.पं. सदस्य सुशील खराती, जेष्ठ कार्यकर्ते जोगदास कुसनाके, महादेव सिडाम, ग्रापं सदस्य रीना मुजुमदार, उमा आत्राम, वेदिका गनलावार, राजू पम्बालवार तसेच परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासन खाते व गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व असल्यामुळे सध्या धर्मरावबाबा व्यस्त आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते ४ डिसेंबर रोजी मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील सत्कार कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत
लगाम येथे आगमन होताच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांचा आतषबाजी करत ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे जंगी स्वागत केले. मंचावर भलामोठा हार गळ्यात टाकून कार्यकर्त्यांनी जयघोष करत परिसर दणाणून सोडला.