
गडचिरोली : विधान परिषदेचे सदस्य अॅड.अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवारी (दि.28) गडचिरोलीत झालेल्या पदवीधर रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात एका दिवसात 36 कंपन्यांनी 517 पदवीधरांना नियुक्तीपत्र दिल्याचे आयोजकांनी कळविले. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा मेळावा ठरल्याचे आ.अभिजित वंजारी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

येथील महाराजा सेलिब्रेशन सभागृहात दिवसभर चाललेल्या या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड.अभिजित वंजारी, तर पाहुणे म्हणून काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, समशेरखाँ पठाण, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ.हेमंत सोनारे, रघुराम गायकवाड उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या टोकावर असला तरी आता येथे मोठमोठे उद्योग येत आहेत. या उद्योगांना लागणाऱ्या कौशल्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम आता पुढल्या काळात गोंडवाना विद्यापीठात आम्ही सुरू करीत आहोत. येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला संधी देण्याचे कार्य अशा पदवीधर मेळाव्यातून उत्तमरीत्या होते. त्यामुळे सातत्याने असे मेळावे आयोजित करुन तरुणाईला करिअरच्या संधी यापुढेही उपलब्ध करुन देण्यात येतील. फक्त गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईने दारी चालून आलेल्या अशा संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आ.वंजारी म्हणाले, कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची अनेक क्षेत्रात आवश्यकता आहे. मात्र, कंपन्या योग्य व्यक्तीपर्यंत अथवा संबंधित व्यक्ती कंपन्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. या दोहोंमधला दुआ बनण्याचे कार्य पदवीधर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशन करत आहे. राज्यभरातील विविध नामांकित कंपन्या एकाच ठिकाणी आणून रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. निवड झाल्यानंतर, ऑफर लेटर मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने कसे करायचे, हे उमेदवारांनी ठरवायचे आहे. येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा कायम आमच्यासोबत जुळलेला असेल. ज्यांना नोकरी अथवा संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी यापुढेही गोविंदराव फाऊंडेशन प्रयत्न करेल, असेही आ.वंजारी म्हणाले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीकडे लक्ष वेधले. अशा प्रकारची संधी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईला पहिल्यांदाच मिळाली. आम्ही संधीच्या शोधात आहोत, हे मेळाव्यात जमलेल्या गर्दीने दाखवून दिल्याचे ते म्हणाले.
फाऊंडेशनचे सचिव डॉ.हेमंत सोनारे यांनी प्रास्ताविकातून पदवीधरांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.गोपाल चव्हाण यांनी तर आभार डॉ.संतोष चकोले यांनी व्यक्त केले.
विविध क्षेत्रातील 36 कंपन्यांचा सहभाग
पदवीधर रोजगार मेळाव्यात निर्मिती, ऑटोमोटिव्ह, आय.टी., बँकिंग, सर्व्हिस, फार्मा, कृषी क्षेत्रातील सुमारे 36 कंपन्या सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. कंपनीच्या प्रतिनिधींनी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेत योग्य उमेदवारांची निवड केली. निवड झालेल्या युवक-युवतींना आ.अभिजित वंजारी यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले.