गडचिरोली : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमातील निकषानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेकडून प्राधान्याने करावयाची कामे वेगाने सुरू आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शेखर शेलार तसेच सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी याचा नियमित आढावा घेऊन, सर्व कामे वेळीच पूर्ण केल्या जातील, यावर लक्ष ठेवून आहेत.

आतापर्यंत झालेल्या कामांमध्ये शासकीय कार्यालयांची स्वच्छता केली आहे. अभिलेख वर्गीकरणामध्ये सहा गठ्ठे पद्धतीद्वारे अनावश्यक कागदपत्रे काढून टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित केलेली असून वाहनांची लिलाव प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. तसेच जुनी व निरुपयोगी, दुरुस्त न होण्याजोग्या भांडारवस्तू, साहित्य व यंत्रसामग्री यांची लिलाव प्रक्रिया करण्यात आली असुन साहित्याची उचल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
प्रलंबित कामांची संख्या शुन्यावर कशी येईल, याचे प्रयल सुरु आहेत. विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी हे नागरिकांना कार्यालयात भेटीकरीता केव्हा उपलब्ध असतील याची माहिती सर्व कार्यालयांसमोरील फलकावर नमूद केली आहे. शासकिय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील याची दक्षता घेतली जात आहे. तसेच अभ्यागतांना बसण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
याप्रमाणे होत आहे सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी
– जि.प. गडचिरोली कार्यालयाची एनआयसी प्लॅटफार्मवर नवीन वेबसाईट बनवून अद्यावत केली आहे.
– पंचायत समिती आरमोरी, कुरखेडा यांची स्वतंत्र वेबसाईट व इतर पंचायत समितीकरीता जि.प. कार्यालयीन वेबसाईटवर माहिती अद्यावत केली आहे.
– सुकर जीवनमान अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणात तसेच मार्गदर्शनाखाली दोन उपक्रम प्रगतीपथावर आहेत.
अ) असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन 60 वर्षावरील लाभार्थ्यांना पाच आजारामध्ये (उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर) सर्व्हेक्षण करणे.
ब) अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना 5 टक्के थेट निधी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमधील नाविन्यपूर्ण विकास कामांचे नियोजन करुन कामे पूर्ण करणे.
– जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक शुक्रवारला स्वच्छता मोहीम राबविणे सुरू आहे, यामध्ये कार्यालय व कार्यालयीन परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येत आहे.
– आपले सरकार, पी.जी. पोर्टल, लोकशाही दिन, मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे वेळोवेळी निकाली काढण्याचे काम जलदगतीने सुरु आहे.
– उद्योगस्नेही वातावरणाची निर्मिती करण्यात येत आहे, उद्योगांना विहित वेळेत परवानगी मिळेल याची खबरदारी घेण्यात येत आहे.
– खातेप्रमुख, गटविकास अंधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारे शासनाचे महत्वाचे प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी देणे सुरु आहे.
– सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे केआरए नुसार दरमहा मुल्यमापन केले जात आहे.
– 36,633 नवीन घरकुलांना मंजुरी दिली असून त्यापैकी 2937 घरकुले एका महिन्यात पूर्ण झाली आहेत.
– जलयुक्त शिवारअंतर्गत 97,933 क्युबिक मीटर पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली. नवीन 28 कामे नाम फाउंडेशन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतीपथावर आहेत.
दर शनिवारी केले जाते कामकाज
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील सर्व कार्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांना दुरदृष्य प्रणालीद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमीत संवाद साधला जात आहे. वरील सात कलमी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदर कामकाज दर शनिवारी कार्यालय सुरु ठेऊन मोहिम स्वरुपात केले जात आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिली.