चामोर्शी : शाळा संपल्यानंतर मित्रांसोबत मौजमस्ती करत गावतलावात पोहण्यासाठी गेलेली दोन मुले तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना चामोर्शी तालुक्यातल्या कुनघाडाजवळील मालेर (मालगुजारी) येथे घडली.
रजत संतोष मोहुर्ले (13 वर्ष) आणि अस्तित्व संदीप मांदाडे (12 वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे सध्या सर्व शाळा सकाळपाळीत भरविल्या जात आहेत. त्यामुळे शाळा सुटताच मुले खेळण्यात दंग होतात. बुधवारी रजत आणि अस्तित्व हे इतर काही मित्रांसोबत शेतातील आंबे तोडण्यासाठी गेले होते. तेथून परत घरी जाताना त्यांना गर्मीपासून दिलासा मिळण्यासाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या तलावात आंघोळ करण्याची इच्छा झाली. पण पाण्यात उतरल्यानंतर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.

या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी त्यांना बाहेर काढून कुनघाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. पण डॅाक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रजत मोहुर्ले हा कुनघाडाच्या विश्वशांती विद्यालयात तर संदीप मांदाडे हा मालेरच्या जि.प.शाळेत शिकत होता. दोघेही सातव्या वर्गाचे विद्यार्थी होते.