वादळी पावसासह गारांचाही मारा, गडचिरोलीत झाडांच्या फांद्या तुटल्या

जिल्हा परिषद कार्यालय अंधारात

गडचिरोली : सोमवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह 15 ते 20 मिनिट पाऊस बरसला. यादरम्यान थोडावेळ छोट्या गारांचाही मारा झाला. यामुळे गडचिरोलीकरांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेरील झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. वीज पुरवठा खंडीत झाल्याने ‘मिनी मंत्रालय’ म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयात अंधार पसरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्या अंधारात चाचपडत बाहेर पडावे लागले.

हा वादळी पाऊस जिल्ह्याच्या उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी होता. त्यामुळे उन्हाळी धानासह शेतात कापणीच्या प्रतीक्षेत असलेल्या मक्याचे पीक आडवे होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

सायंकाळी 5.30 ते 6 वाजतादरम्यान हा वादळी पाऊस आणि गारपीट झाली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचे वेध लागलेले असल्याने हातातील कामे लवकर आटोपती घेण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती. अशातच पाऊस-वारा सुरू झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. आधीच पावसाचे ढग दाटून आले असताना वीज पुरवठा खंडीत झाल्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीत अंधाराचे साम्राज्य पसरले होते. केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) यांचे कक्ष वगळता कुठेही वीज पुरवठा सुरू नव्हता. संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालयाच्या कामकाजासाठी इन्व्हर्टर नसल्यामुळे संपूर्ण कामे ठप्प झाली होती. शेवटी पावसाने उसंत घेताच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तशाच अवस्थेत मोबाईलमधील टॅार्चचा सहारा घेत कार्यालयातून बाहेर पडून घराचा रस्ता धरला.

शहराच्या अनेक भागात झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. काही ठिकाणी वीज ताराही तुटल्या. पण यादरम्यान रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे कुठे जीवित हाणी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झालेला होता.