परंपरेला फाटा देत जामगिरीत झाला सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा

बँड नाही, अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव

चामोर्शी : विवाह सोहळा मानवाच्या जीवनातील महत्वाचा घटक. म्हणून हा सोहळा पार पाडताना बहुजन वर्गात आजही मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करून पैशाची लयलूट होताना दिसते. मात्र याला अपवाद ठरला तो गडचिरोली जिल्ह्यातील जामगिरी गावातील वाढई आणि मोहुर्ले परिवारातील विवाह सोहळा.

रविवार दि.27 एप्रिल रोजी मंगलाताई आणि संतोष मोहुर्ले रा.जामगिरी यांची कन्या तेजस्विनी हिचा विवाह गावातीलच बेबीबाई दयाराम वाढई यांचे पूत्र तुषार यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने झाला. या विवाह सोहळ्यात ना कोणता बँडबाजा होता, ना डिजे होता. कोणतेही पौरोहित्य न करता महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेला सत्यशोधक विवाह त्यांनी घडवून आणला.

सर्वप्रथम वर-वधू आणि त्यांच्या आप्तेष्टांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून वंदन केले. याप्रसंगी अक्षता म्हणून धान्याऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. त्यानंतर सत्यशोधक विधिकर्ते मनोज सोनुले यांनी गीताच्या रूपाने वंदना गाऊन महात्मा फुले लिखित मंगलाष्टकांचे गायन केले. त्यानंतर लगेच सत्यशोधक विधिकर्ते सुनील कावळे यांनी सत्यपुजा सांगून वर-वधूला प्रतिज्ञा दिली.

या कार्यक्रमाला चामोर्शी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुखदेव कावळे, खोर्दा येथील सामाजिक कार्यकर्ते बुद्धप्रसाद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते खुशाल वाढई, दिलीप वाढई, राजू ठाकरे, ओमदेव आदे, तसेच गावातील बरीच मंडळी आणि आप्त परिवार उपस्थित होते. कमी वेळात, कमी खर्चात होणारा हा विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.