देसाईगंज : रोजगार आणि विकासाच्या नावाखाली बळजबरीने स्थानिकांच्या सुपिक जमिनी भांडवलदारांच्या घश्यात घालण्याचे काम सरकार आहे. जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू स्टील प्रकल्पासाठी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनींचे भूसंपादन करण्यात येवू नये, बळजबरीने हा प्रयत्न केल्यास स्थानिक भूमीपूत्र तो खपवून घेणार नाहीत, असा इशारा मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाने दिला आहे. त्यासाठी त्यांनी देसाईगंजच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदनही सादर केले.

मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेने संपूर्ण राज्यातील स्थानिक मुद्यांवर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली होती. याअंतर्गत माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, रूषी सहारे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली.
देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी उद्योगांना न देता पर्यायी सरकारी व वनविभागाच्या जमिनी देण्यात याव्या, स्थानिक ग्रामसभांचा प्रखर विरोध असलेला कोरची तालुक्यातील झेंडेपार लोहप्रकल्प रद्द करण्यात यावा, काबीलकास्त शेती कसणाऱ्यांना पट्टे देण्यात यावे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत अर्थसहाय्य जमा करण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेच्या विधवा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ द्यावा, 60 वर्षावरील सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगारांना 5 हजार रुपये महिना पेन्शन देण्यात यावी, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करण्यात यावे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव देण्यात येवून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी, जबरानजोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे हत्तींनी नुकसान केले त्या शेतकऱ्यांना एकरी ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, धान बोनस त्वरित जमा करावा या व इतर मागण्यांचा यात समावेश होता.
या आंदोलनात तालुका सचिव राजू सातपुते, विठ्ठल प्रधान, देवचंद मेश्राम, नंदू बांडे, शेषराव वासेकर, प्रेमलाल बारसागडे, श्यामराव बारस्कर, देवराव तोरणकर, दिलीप कुकुडकर, विलास बारस्कर, हेमराज भोयर, रघुनाथ बारस्कर, देवराव उपरीकर, मोरेश्वर धुमाने, केवळ मेश्राम, गंगाधर मोटघरे, राजू भोयर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.