देसाईगंज : अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी महावितरण कार्यालयाकडे 4 ते 5 वर्षांपूर्वी डिमांड भरली होती. मात्र इतका कालावधी उलटूनही अद्याप प्रत्यक्ष वीज कनेक्शन मिळालेले नाही. आता महावितरणकडून शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम परत केली जात आहे. मात्र हे करताना त्यातून जीएसटी कापण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी काँग्रेसच्या नेतृत्वात महावितरणकडून मिळालेल्या चेकची होळी करण्यात आली. (सविस्तर बातमी खाली वाचा)

वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आता शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम महावितरणकडून परत केली जात आहे, मात्र तीही पूर्ण नाही. परत करताना त्यातून जीएसटी कापण्यात येत आहे. वास्तविक शेतकऱ्यांनी जी रक्कम भरली, ती पूर्ण रक्कम परत न करता त्यातून जीएसटी (कर) वजा करणे हे अन्यायकारक असल्याने या बाबीचा निषेध करण्यात आला.
आ.रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात माजी जि.प.उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, अॅड.विश्वजित कोवासे, सतीश विधाते, परसराम टिकले, रजनीकांत मोटघरे, वसंत राऊत, अनिल कोठारे, रुपेश टिकले, शंकरराव सालोटकर, जितेंद्र मुनघाटे, हरबाजी मोरे, रमेश चौधरी, ढिवरू मेश्राम, पिंकू बावणे, जावेद शेख, कुणाल ताजने यांच्यासह इतर पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांना निवेदन सादर करण्यात आले.
संबंधित सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या भरलेल्या डिमांडच्या आधारे तात्काळ कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात यावे आणि जी रक्कम परत केली जात आहे ती GST किंवा अन्य वजावट न करता 100 टक्के परत करावी, अशी मागणी करण्यात आली.