जनसुरक्षा कायदा रद्द करा, महाआघाडीकडून निदर्शने

9.5 हजार हरकतींकडे दुर्लक्ष

गडचिरोली : राज्य सरकारने नव्यानेच केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी काल (दि.10) गडचिरोलीत महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसह डाव्या पक्षांनी निदर्शने केली. हा कायदा नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारा असल्याचा सूर यावेळी उमटला. या विधेयकावर राज्यभरातून 13 हजार हरकती आल्या होत्या. त्यापैकी 9.5 हजार हरकतींमधून विधेयकाला विरोध झाला होता, मात्र जनभावनेचा विचार न करता हे विधेयक पारित केल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.

या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनियता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, संवेदनशील आणि मागास जिल्ह्यातील नागरिकांवर अशा दडपशाही स्वरूपाच्या कायद्याचा विपरित परिणाम होईल. स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सामान्य नागरिक यांच्यावर अवाजवी पोलीस नियंत्रण येईल. विरोधी मत मांडणाऱ्या लोकांना अन्यायकारक कारवायांचा सामना करावा लागेल, अशी भिती व्यक्त करत हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचा आरोप यावेळी विविध वक्त्यांनी केला.

इंदिरा गांधी चौकात झालेल्या या सर्वपक्षीय धरणे आंदोलनात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, भाकपचे डॉ.महेश कोपूलवार, देवराव चवळे, माकपचे अमोल मारकवार, अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, राष्ट्रवादी (एसपी)चे प्रकाश ताकसांडे, आझाद समाज पार्टीचे राज बन्सोड, महिला काँग्रेसच्या अॅड.कविता मोहरकर, याशिवाय हंसराज उंदीरवाडे, भारत जांभुळकर, नरेंद्र रायपुरे, सचिन मोतकुरवार, सुरज जपकुलवार, कुणाल कोवे, शिवाजी नरोटे, विलास निंबोरकर, सतीश विधाते, वसंत राऊत, प्रशांत कोराम, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, प्रभाकर कुबडे, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, प्रफुल आंबोरकर, श्रीनिवास ताटपल्लीवर, गैरव येनप्रेडीवार, गुरुदेव भोपये, बाळकृष्ण सावसागडे, उमेश आखाडे, अजय भानारकर, स्वप्नील बेहरे, भास्कर इंगळे, देवेंद्र बांबोळे, संतोष कोटकर, देवराव रोहणकर, विनोद सुदा, तुकाराम मडावी, तुळशीराम मोहुर्ले, उपेंद्र रोहणकर, दिवाकर साखरे, नामदेव पोले, केशवराव सातपुते, प्रभाकर कोटरंगे, सुखदेव जेंगठे, हेमंत सहारे, नरेंद्र उंदीरवाडे, अविनाश तुरे, प्रकाश दुधे, सुखदेव वासनिक, नरेंद्र रायपुरे, कविता उराडे, कल्पना नांदेश्वर, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, रिता गोवर्धन, सुनीता रायपुरे, कल्पना संगेवार, प्रभा भांडेकर यांच्यासह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.