गडचिरोली : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या दुर्गम जिल्ह्यामध्ये आरोग्याचे योग्य आणि वेळेवर निदान हा विषय गंभीर आहे. जिल्ह्यातील शेकडो लोक कर्करोग निदानासाठी हजारो रुपये खर्च करून अन्य जिल्ह्यांमध्ये जातात आणि उपचार करतात. त्यामुळे या जिल्ह्यात कर्करोगाचे निदान आणि उपचारासाठी कर्करोग रुग्णालय उभारून गोरगरीब, शोषित, वंचित नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॅा.खुणे यांनी केली आहे. कर्करोगाचे वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत समाजात व्यापक जनजागृती करणे काळाची गरज आहे. या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचारांचीच नव्हे, तर सामाजिक पाठबळाची आणि मानसिक आधाराचीही नितांत आवश्यकता असते.
आपण सर्वजण मिळून कर्करोगमुक्त भविष्यासाठी प्रयत्नशील राहुया, आणि सुदृढ जीवनशैलीचा अंगीकार करण्याचा दृढ संकल्प करूया. गडचिरोली जिल्ह्याला अधिक सक्षम व सुदृढ बनवुया, असे प्रतिपादन डॉ.प्रणय खुणे यांनी केले.
































