मंत्रिपदापेक्षा माझा समाज महत्वाचा, धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

आलापल्लीत विविध पक्षांचे नेते एका मंचावर

अहेरी : आयुष्यात मी अनेक वेळा निवडून आलो आणि मंत्रिपद देखील भूषवले आहे. आता तर थेट कॅबिनेट मंत्री झालो. असे मंत्रिपद येते आणि जाते. मात्र माझ्या समाजामुळेच माझी ओळख आहे. त्यामुळे मला मंत्रीपद महत्वाचे नसून माझा समाज महत्वाचा आहे, असे वक्तव्य राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. आलापल्ली येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके चौकात आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विशेष म्हणजे वेगवेगळ्या पक्षांत सक्रिय असणारी नेतेमंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर आल्याचे चित्र पहायला मिळाले.

यावेळी सहउद्घाटक म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, विशेष अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जि.प. सदस्य अनिता दीपक आत्राम, माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, वीर बाबुराव स्मारक समितीचे अध्यक्ष भीमराव आत्राम, सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती इंदरशहा मडावी, माजी सेवानिवृत्त वनाधिकारी हनुमंत मडावी, ज्येष्ठ नागरिक सुखरू कोरेत, ईश्वर वेलादी, रघुपती सिडाम, पत्रुजी आत्राम, जन्नुबाई नैताम, सांबय्या करपेत, प्रभाकर आत्राम, बंडू आत्राम, लक्ष्मण तोर्रेम, व्यंकटी मडावी, रमेश मडावी, ग्रामपंचायत सदस्य विजय कुसनाके, संतोष अर्का, मनोज बोलुवार, कैलास कोरेत आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना.आत्राम यांनी सर्वसामान्य नागरिकांनी भरभरून प्रेम दिल्यानेच मला मंत्रीपदापर्यंत मजल मारता आली. या पदाचा प्रत्येक समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडेच माझे लक्ष होते आणि राहील. प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही लोकं आपल्या आदिवासी समाजमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी वज्रमुठ बांधण्याची गरज आहे. राजकारणात आपण कितीही विरोधक असलो तरी समाजासाठी मात्र एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे समाजाच्या कार्यक्रमात राजकारण न करता समाजहिताचे काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

सह उदघाटक म्हणून बोलताना माजी आमदार दीपक आत्राम यांनी देशात मोघल आले, निजाम आले, त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले. त्यात आपल्या समाजाचे मोठे नुकसान झाले. आदिवासी समाज हा देणारा समाज होता. मात्र आता विविध योजना घेऊन जीवन जगावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळाला. आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून आपल्या चालीरीती आणि रूढी परंपरा देखील लुप्त होताना दिसत आहेत. त्यामुळे ते टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

ढोलताशांच्या गजरात निघाली रॅली

वीर बाबुराव स्मारक समितीतर्फे अल्लापल्ली शहरातील विविध भागातून ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी नृत्य सादर करत पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुर्गम भागात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरे यांनी, तर आभार सरपंच शंकर मेश्राम यांनी मानले. आयोजकांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध पक्षांच्या मान्यवरांना एका मंचावर आणले.