गडचिरोली : जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आज, रविवार दि.28 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील 82 हजार 984 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 11 लाख 41 हजार 165 असून, प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरणाची सुविधा पोहोचावी यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात 2,308 पोलिओ लसीकरण केंद्रे (बुथ) उभारण्यात आली आहेत.
प्रवासादरम्यान किंवा दुर्गम भागातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी 123 ट्रान्झिट पथके बसस्थानके, रेल्वे स्थानके, तपासणी नाके व इतर गर्दीच्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. तसेच दुर्गम पाडे, वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 98 मोबाईल (फिरती) पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामपंचायत स्तरावरील लसीकरण केंद्रे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकाला जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन
जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना यासंदर्भात आवाहन केले आहे. “लसीकरण हे बालकांच्या आरोग्याचे प्रभावी संरक्षण आहे. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून कायमस्वरूपी बचाव करण्यासाठी प्रत्येक पात्र बालकाला पोलिओ डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. या लोकहिताच्या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,” असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले, “पोलिओमुक्त भारत हे आपले राष्ट्रीय ध्येय आहे. या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे म्हणाले, “दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका आपल्या सेवेत तत्पर राहतील. पालकांनी कोणतीही शंका न बाळगता आपल्या बालकाला पोलिओचा डोस द्यावा.”
































