विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मला पुन्हा एकदा संधी द्या- खा.नेते

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गर्दी

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय-पिरिपा या महायुतीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार कार्यालयाचे रितसर उद्घाटन लोकसभा प्रभारी अतुल देशकर यांच्या हस्ते बुधवारी संध्याकाळी झाले. चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयालगतच हे प्रचार कार्यालय उघडण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आ.डॉ.देवराव होळी, लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुल देशकर, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे यांच्यासह नुकतेच भाजपवासी झालेले माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, तसेच डॉ.मिलिंद नरोटे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, गोविंद सारडा, जिल्हा संघटनमंत्री संजय गजपुरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी खा.नेते यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या योजना आणि घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. तसेच गडचिरोली-चिमूर मतदार संघातील रेल्वेमार्ग, सिंचनाचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प, हवाईपट्टीचा प्रस्ताव अशी अनेक कामे मंजूर करून आणण्यात सिंहाचा वाटा उचलल्याचे सांगितले.

तुम्ही डुबत्या नावेला सोडले बरे केले

यावेळी खा.नेते यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तुम्ही डुबणाऱ्या नावेला सोडून यशस्वीपणे पैलतीर गाठणाऱ्या नावेत बसण्यास पसंती दिली. त्यामुळे मी तुमचे स्वागत करत असून महायुतीच्या विजयात तुमचाही सिंहाचा वाटा राहील असा आशावाद आणि अपेक्षा खा.नेतेा यांनी व्यक्त केली. या भागातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणि प्रधानमंत्र्यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या, अशी विनंती खा.नेते यांनी याप्रसंगी केली.

यावेळी लोकसभा प्रभारी तथा माजी आ.अतुल देशकर, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, डॅा.मिलींद नरोटे, डॅा.नितीन कोडवते, डॅा.चंदा कोडवते यांनीही आपले विचार व्यक्त केले.