देसाईगंज : तालुक्याच्या कोंढाळा येथे सामाजिक बांधिलकी जपत एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मेघनादाच्या जत्रेला यावर्षीही हजारो लोकांनी गर्दी केली. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ही मेघनाद जत्रा (गरदेव) उत्सव ओळखला जातो. धुलीवंदनाच्या एक दिवस अगोदर रात्रीला मेघनाद देवाची पूजाअर्चा केली जाते. रात्रभर चालणाऱ्या पुजाअर्चेनंतर दुसऱ्या दिवशी जत्रेच्या ठिकाणी पुजा करून जत्रेला सुरूवात केली जाते.

गावातील बुराडे परिवाराच्या पुढाकाराने दिडशे वर्षापूर्वी मेघनाद जत्रा उत्सवाची परंपरा सुरू झाली होती. पुरातन लोककला आणि संस्कृतीची ओळख दाखविणारी ही जत्रा लोकोत्सवाच्या रुपात जपली जाते. गावातील सर्व नागरिक मोठ्या आस्थेने गरदेवाचे पूजन करून सर्वांच्या कल्याणासाठी भक्तिभावाने मनोकामना करतात.
गावात एकीकडे रंगांची उधळण, तर दुसरीकडे गरदेव पूजेचे चैतन्यमय वातावरण बघण्यासाठी परिसरातील गावांमधून नागरिक येतात. गरदेव उत्सवात आलेल्यांसाठी मनोरंजन आणि समाजप्रबोधनासाठी नाट्यप्रयोगाचेही आयोजन करण्यात येते. वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी यात्रेदरम्यान गरदेवाची पूजा केली जाते. बुराडे परिवार व गावकरी मिळून जत्रेला आलेल्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करतात.