
देसाईगंज : आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने वडसा (देसाईगंज) येथील नगर परिषद सभागृहात विशेष आढावा बैठक उत्साहात पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय कुटे, विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी, विदर्भ सहसंयोजक प्रवीण दटके, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते आणि प्रमुख लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर मतदार नोंदणी दुप्पट करण्याचे लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवले. सध्या झालेली शासकीय नोंदणी ही प्राथमिक स्वरूपाची असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संपर्क वाढवून शासकीय आकडेवारीपेक्षा दुप्पट मतदार नोंदणी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. येत्या दिड महिन्यात संघटनेच्या सर्व यंत्रणांनी पूर्ण ताकदीने काम करून हे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, सुशिक्षित वर्गासह समाजातील विविध घटकांमध्ये पसरविल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीला वस्तुनिष्ठ उत्तर देणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अधिकृत माध्यमांवरून प्रसारित होणारे जनहिताचे निर्णय, विकासकामे व सरकारच्या योजना सोशल मीडिया, फेसबुक तसेच अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नियमितपणे जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करणे, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे आणि राज्यातील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शासन सातत्याने कार्यरत आहे. विकासाची ही गाथा प्रत्येक पदवीधर, सुशिक्षित, कष्टकरी व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपा कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असेही आ.चव्हाण यांनी सांगितले.
तळागाळातील कार्यकर्ते हेच पक्षाच्या संघटनेची खरी ताकद असल्याचे नमूद करताना, मतदार नोंदणी आणि संघटन विस्तारासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने व सहकार्य, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक, समर्पित व संघटनात्मक कार्याचे कौतुक करून आगामी पदवीधर निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, विधान परिषद सदस्य संजय भेंडे, विधान परिषद सदस्य अरुण लखानी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी बंटी भांगडिया, आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गडचिरोली लोकसभा प्रमुख किशन नागदेवे, सुधाकर कोहळे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, देसाईगंजच्या नगराध्यक्ष लता सुंदरकर, आरमोरीचे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, अर्चना डहाणकर, रेखा डोळस, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा नोंदणी प्रमुख प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, सदानंद कुथे, प्रकाश गेडाम, बबलू हुसैनी, अनिल पोहनकर, मोतीलाल कुकरेजा, भारत बावणथडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































