रिमझिम पावसात निघालेल्या तिरंगा रॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष

पोलीस जवानांच्या वीरपत्नींचा सत्कार

गडचिरोली : आॅपरेशन सिंदूर नंतर गडचिरोली शहरात मंगळवारी सायंकाळी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ “तिरंगा यात्रा” काढण्यात आली. भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, शहरातील नागरिक आणि विद्यार्थी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिमझिम पावसातही 75 मीटरचा तिरंगा घेऊन सहभागी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानविरोधात नारेबाजी केली. ‘सुनलो बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्थान’ या नाऱ्याने शहर निनादून गेले होते. यात्रेनंतर गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला.

या यात्रेत माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते, आ.डॅा.मिलींद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, रमेश भुरसे, अनिल पोहणकर, शिवसेनेचे (शिंदे) सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, वर्षा शेडमाके, डॅा.चंदा कोडवते, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशिल हिंगे, हेमंत राठी, गोवर्धनजी चव्हाण, डॉ.भारत खटी, गजाननराव येनगंदलवार, सुधाकर येनगदलवार, दिलीप सारडा यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

ही रॅली केवळ एक औपचारिकता नव्हती, तर भारतमातेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना समर्पित एक राष्ट्रभक्तीपूर्ण आणि शूरवीरांना वंदन करणारी भावना त्यातून प्रकट होत होती. इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या प्रांगणातून रॅलीला सुरूवात होताच वरूणराजाने रिमझिम बरसून जणूकाही या रॅलीत आपणही सहभागी होत असल्याचा संदेश दिला.

पावसाच्या सरी अंगावर झेलत, मनामनात तिरंग्याचा अभिमान, डोळ्यांत देशप्रेम आणि ओठांवर ‘भारत माता की जय’चा गजर करत ही रॅली शहराच्या कारगिल चौक, तेली मोहल्ला, त्रिमूर्ती चौक मार्गे पुन्हा चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या प्रांगणात आली. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या वीरपत्नी आणि कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कल्पना अशोक अमृतकर, संगीता विलास मांदाडे, नयना पुरुषोत्तम मेश्राम, मनिषा दुर्योधन नागतोडे, विजय रवी चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

रॅलीचा समारोप करताना भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले, ही तिरंगा यात्रा राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ उभी राहिलेली जनशक्ती आहे. भारतमातेच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या आपण पाठीशी आहोत हा संदेश देणारी असल्याचे ते म्हणाले.