अहेरी : शेतकऱ्यांनी रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा अधिक वापर करून शेतात उत्पादन घ्यावे, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. आलापल्ली येथील वनविभागाच्या वनसंपदा सभागृहात तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक व कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. (सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा)

यावेळी मंचावर उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजीवार, जिल्हा कृषी समन्वयक डॉ.किशोर झाडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतावर भर देऊन धान, कापूस, मका, मिरची पिकासोबतच काजू, स्ट्रॉबेरी, नारळ या पीकांसोबत आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जोडधंदा म्हणून शेततळे तयार करून मत्स्यव्यवसाय, तसेच बांबू लागवडही करण्याचे आवाहन केले.
तत्पूर्वी अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या पाचही तालुक्यातील कृषीसंबंधी माहिती अवगत करून व आढावा घेऊन कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य व मदत करून शेतातील उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी जनजागृती करण्याचे निर्देश दिले.
प्रास्ताविक आनंद गंजीवार यांनी तर संचालन भूषण गोव्हाळे यांनी केले. आभार चेतन पानबुडे यांनी मानले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सेवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.