गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या संवेदनशिल आणि मागास जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून प्रशंसा करून घेतली. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांमध्येही आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र पालकमंत्री या नात्याने आतापर्यंत त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधलेला नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही, असा ठपका ठेवत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देवाभाऊंच्या जिल्हा आगमनासाठी शुक्रवार, दि.6 जून रोजी सेमाना देवस्थान येथे महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू असून त्यातून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रानटी हत्ती, वाघ, अस्वल यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे शेतीवर गंभीर परिणाम झाला आहे. शेतीला 24 तास वीज पुरवठा मिळत नाही. शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालेला नाही. जड वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रेतीचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. कंत्राटदारांचे देयके थकित आहेत. रोजगार हमीतील लाभार्थ्यांचे अनुदान मिळाले नाही. विहिरींचे देयके प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील अशा अनेक समस्यांनी तोंड वर काढलेले असताना गेल्या 3 वर्षांपासून पालकमंत्री म्हणून फडणवीस यांनी या समस्यांकडे एकदाही गांभिर्याने लक्ष दिले नाही, असा काँग्रेसचा आरोप आहे.
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात येऊन नागरिकांना प्रत्यक्ष दर्शन द्यावे, त्यांच्याशी संवाद साधावा, नागरिकांच्या व्यथा जाणून घ्याव्यात, यासाठी सेमाना देवस्थानात महायज्ञ केला जाणार असल्याचे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.